परदेशी संस्था, जगभरातील प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचा जथ्था यांच्या वाढत्या व्यापामुळे पुनर्वसनाच्या कामांत येणाऱ्या अडचणींनी ग्रासल्यामुळे नेपाळने सोमवारी अधिकृतरीत्या जगभरातील ३३ परदेशी मदतकर्त्यांना मायदेशी परत जाण्यास सांगितले. काठमांडू व आजूबाजूच्या भागात मदतकार्य पूर्ण झाले असून परदेशातून आलेल्या मदत पथकांनी परत जावे. उरलले पुनर्वसनाचे काम आम्ही करू, असा पवित्रा नेपाळने घेतला. दरम्यान,  हा निर्णय तुम्हाला लागू नाही, असे नेपाळ सरकारने सोमवारी रात्री भारतास स्पष्ट केले.
मदतकार्याचा पहिला टप्पा आता संपला असून ठिकठिकाणी जमलेले मातीचे ढिगारे उचलण्याचे काम आता मोठय़ा प्रमाणावर करायचे आहे.  गेल्या आठ दिवसांत बाहेरील मदतीवरच शक्य तेवढे पुनर्वसन रेटून नेले तरी आता परदेशी संस्था आणि प्रसारमाध्यमांच्या कामांमुळे पुनर्वसनाच्या कामात मोठय़ा प्रमाणावर अडथळे येत असल्याने समाजमाध्यमांवर नेपाळी नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. ढिगाऱ्यांखाली कुणी जिवंत असण्याची शक्यता नाही त्यामुळे शोधकार्य थांबवण्यात येत असल्याचे नेपाळने यापूर्वीच जाहीर केले आहे. सोमवारी ३३ देशांमधील मदत पथकांना नेपाळने मायदेशी जाण्यास सांगितले.
नेपाळमधील सहाय्यकर्ते
भूकंपानंतर जगभरातून ७६ मदत पथके, ७० वैद्यकीय पथके असा एकूण ४ हजार ५० मदतकर्त्यांचा लवाजमा नेपाळमध्ये गेला आठवडाभर कार्यरत आहे. यात भारताकडून ९६२ जणांचा चमू मदतीसाठी रवाना झाला आहे.
भारताचे आभार
भूकंपाने तडाखा दिल्यानंतर अवघ्या सहा-सात तासांत त्वरित मदत पाठवून आपल्या अनेक लोकांचे प्राण वाचविण्याकामी मोलाची मदत केल्याबद्दल नेपाळने भारताचे आभार मानले आहेत. यापुढेही भारत पुनर्वसन कार्यात सक्रीय राहील, असे संकेत नेपाळचे भारतातील राजदूत दीपकुमार उपाध्याय यांनी दिले. नेपाळचे पोलीस, लष्करी अधिकारी व स्थानिक संस्थांकडे अशी परिस्थिती हाताळण्याची क्षमता आहे. परंतु आमच्याकडे साधनसामुग्रीचा तुटवडा आहे, असे सांगत नेपाळमधील परिस्थितीकडे सकारात्मकतेने बघून प्रसारमाध्यमांनी आम्हाला सहकार्य करावे, असेही आवाहन उपाध्याय यांनी केले.

माउंट एव्हरेस्ट मोहिमेवर बंदी
नेपाळमधील भूकंपानंतर तेथील सरकारने माउंट एव्हरेस्टवर जाण्यास आता बंदी घातली असून अनेक भारतीय गिर्यारोहकांनी त्यासाठी पैसे भरलेले असताना त्यांना निराश व्हावे लागले आहे. २५ एप्रिलच्या भूकंपानंतर एव्हरेस्टवर हिमकडे कोसळून २२ गिर्यारोहकांचा मृत्यू झाला होता.
बळींची संख्या ७३०० वर : नेपाळमधील विनाशकारी भूकंपात बळी पडलेल्यांचा आकडा ७३६५ वर गेला असून यात ४१ भारतीयांचा समावेश आहे.