पहिले पंतप्रधान जवाहरलाला नेहरू यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नातेवाइकांवर नुसती हेरगिरीच केली नव्हती तर त्यातून मिळालेली विश्वसनीय माहिती ब्रिटनच्या एमआय ५ या गुप्तचर संस्थेला दिली होती, असे नुकत्याच उघड करण्यात आलेल्या वर्गीकृत कागदपत्रांतून स्पष्ट झाले आहे.
 नेताजींचे सहकारी ए.सी.नम्बियार व पुतणे अमिया नाथ बोस यांच्यातील पत्रे एमआय ५ या संस्थेला दिली होती. एमआय ५ कडून कागदपत्रे नुकतीच उघड करण्यात आली आहेत. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पुतणे अमिया बोस व शिशिरकुमार बोस यांच्यावर हेरगिरी करण्यास परवानगी दिल्याचे अलिकडे भारतीय कागदपत्रातून उघड झाले होते.
६ ऑक्टोबर १९४७ रोजी गुप्तचर अधिकारी एस.बी. शेट्टी यांनी एमआय ५ ते दिल्लीतील संपर्क अधिकारी के .एम बाऊम यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले होते. त्या पत्रात नम्बियार व अमिया बोस यांच्या १९ ऑगस्ट १९४७ च्या पत्रातील सगळे संदर्भ होते. हे पत्र १९ ऑगस्ट १९४७ रोजी एसी नम्बियार यांनी झुरिच येथून अमिया नाथ बोस यांना कोलकात्याच्या पत्त्यावर पाठवले होते. गुप्त सेन्सॉरशिपच्या नावाखाली हे पत्र उघडण्यात आले होते. बाऊम यांनी नम्बियार यांचे पत्र त्यांच्या विनंतीसह पुढे एमआय ५ च्या महासंचालकांना पाठवून दिले होते. बाऊम यांनी पाठवलेल्या पत्रात असे म्हटले होते, की या पत्रावर आपली प्रतिक्रिया अपेक्षित आहे.
ते पत्र बोस यांची पत्नी व मुलीच्या संदर्भात होते की नाही याबाबत स्पष्ट करण्यात आलेले नाही. दोन महिन्यांतील ही दोन पत्रे असून स्वातंत्र्योत्तर काळातील आहे. एमआय ५ या संस्थेने खुल्या केलेल्या कागदपत्रात २००० कागदपत्रांचा समावेश आहे. बोस यांच्यावर संशोधन करणाऱ्या अनुज धर यांच्याकडे ही कागदपत्रे आहेत.
या सगळ्या प्रकरणात भारतीय गुप्तचरांच्या कागदपत्रांवर विश्वासार्हतेबाबत प्रश्न चिन्ह लागले आहे. सुरक्षा आस्थापनांच्या मते बोस व जर्मनी व जपान यांच्यात काही संबंध होते त्यावर प्रश्नचिन्ह लागले आहे. अमिया व मुलगे सरतचंद्र बोस यांच्यावर सरकारनेच २० वर्षे पाळत ठेवली होती, असे कागदपत्रात म्हटले आहे. तीन महिन्यांत ७० हजार कागदपत्रांपैकी केवळ १० हजार कागदपत्रे खुली करण्यात आली आहेत.