बिहारचे नितीश कुमार यांनी काल आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. मात्र सरकार वाचवण्याचा प्रयत्न जेडीयू करताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे एकेकाळचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले लालूप्रसाद यादव आणि नितीश कुमार हे एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी संयुक्त जनता दलाशी युती करण्यास रविवारी साफ  नकार दिला.
बिहारमध्ये जेडीयूशी युती करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे सांगत जेडीयू आणि आरजेडीच्या युतीस त्यांनी नाकारले. रविवारी जेडीयूची बैठक झाल्यानंतर आरजेडीची बैठक होईल. यात आरजेडी नेत्यांशी बिहारच्या सद्यस्थितीबाबत चर्चा केली जाईल, असे यादव यांनी सांगितले. बिहारमध्ये विधानसभेच्या एकूण २४३ जागा आहेत. सरकारच्या बहुमतासाठी १२२ जागांची आवश्यता आहे. त्यापैकी ११६ आमदार जेडीयूकडे आणि आरजेडीकडे २४ आहेत. तर भाजपकडे ९०, काँग्रेसचे ४, भाकपचा १ आणि ६ अपक्ष आमदार आहेत. काँग्रेसनं जेडीयुला आपला पाठिंबा कायम ठेवला आहे.