संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेत भारताने 'टेररिस्तान' म्हणत कानउघाडणी केल्याने संतप्त झालेल्या पाकिस्तानने भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना लक्ष्य केले आहे. 'दोन्ही बाजूंनी दबाव आणण्याची अजित डोवाल यांची रणनिती केव्हाही यशस्वी होणार नाही,' अशा शब्दांमध्ये पाकिस्तानने अजित डोवाल यांच्यावर जोरदार टीका केली. पंतप्रधान शाहीद अब्बासी यांच्या विधानाचा भारताने केलेला निषेध दु:खद असल्याचे पाकिस्तानने म्हटले. 'अब्बासी यांनी काश्मीर खोऱ्यातील पीडित लोकांच्या भावना व्यक्त केल्या. त्यांचे विधान काश्मिरी लोकांची महत्त्वाकांक्षा दर्शवणारे होते,' असे स्पष्टीकरणही पाकिस्तानकडून देण्यात आले. अब्बासी यांचे विधान योग्य असल्याचे सांगत पाकिस्तानने भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना लक्ष्य केले. 'दुहेरी दबाव टाकण्याची अजित डोवाल यांची रणनिती कधीही यशस्वी ठरणार नाही. डोवाल यांच्या रणनितीमुळे आपण आशिया खंडात शक्तीशाली देश होऊ, असे भारताला वाटते. मात्र भारताचे मनसुबे कधीही पूर्ण होणार नाहीत,' असे संयुक्त राष्ट्र संघातील पाकिस्तानचे प्रतिनिधी टिपू उस्मान यांनी म्हटले. पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांचा उल्लेख करत पाकिस्तानने भारतावर निशाणा साधला. 'पाकिस्तानात दहशतवादी कारवाया करताना, हेरगिरी करताना कमांडर कुलभूषण जाधव यांना रंगेहात पकडण्यात आले. अशा लोकांमुळे भारताचे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही. भारताचे स्वप्न केवळ स्वप्नच राहिल,' अशा शब्दांमध्ये पाकिस्तानने भारतावर टीका केली. भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव पाकिस्तानच्या ताब्यात असून त्यांच्यावर हेरगिरी केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. मात्र भारताने याचा इन्कार केला आहे. जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. भारतीय सुरक्षा दलांकडून काश्मीरमध्ये काय कारवाया सुरु आहेत, याकडे आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष आहे. काश्मिरी लोकांवर होणारे अत्याचार मानवाधिकार संघटना पाहत आहेत, असेही संयुक्त राष्ट्र संघातील पाकिस्तानचे प्रतिनिधी टिपू उस्मान यांनी म्हटले. काश्मीर सीमेवर भारतीय सैन्य शस्त्रसंधीचे उल्लंघन करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. भारतीय सैन्याच्या गोळीबारात पाकिस्तानचे १० नागरिक मारले गेल्याचा दावाही त्यांनी केली.