बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीचे समर्थन केले. मात्र, त्याचबरोबर अवैध धंदे बंद झाले तरच काळा पैसा बाहेर येईल. केवळ नोटाबंदीने काळा पैसा बाहेर येणार नाही, असेही ते म्हणाले. ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून रद्द करण्याबाबत मोदी यांनी उचललेले पाऊल योग्य आहे, असेही त्यांनी सांगितले. हिंदुस्तान टाइम्सच्या लीडरशीप परिषदेत नितीशकुमार बोलत होते. केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतला आहे. हे पाऊल चांगले असले तरी, आता बेहिशेबी संपत्ती गोळा करणाऱ्यांवर ठोस कारवाई केली पाहिजे, अशी अपेक्षा नितीशकुमार यांनी व्यक्त केली. केवळ नोटाबंदीचा निर्णय घेऊन काळा पैसा परत येणार नाही. तर आपल्याला बेहिशेबी संपत्तीवर घाव घालायला हवा. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत करतो. कारण त्यांनी एक चांगले पाऊल उचलले आहे आणि माझा त्याच्यावर विश्वास आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. बिहार निवडणुकीत महाआघाडी केल्याप्रकरणी विचारलेल्या प्रश्नावरही त्यांनी सावध उत्तर दिले. परिस्थितीनुसार महाआघाडी केली होती. काही लोकांना तेही चांगले वाटत नाही, असा टोला त्यांनी टीका करणाऱ्यांना लगावला. यावेळी सरकारच्या कामगिरीचेही त्यांनी कौतुक केले. सरकारने राज्यात अनेक चांगल्या योजना सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक घरात नळाचे पाणी पोहचवण्याची योजना आहे. सर्वांसाठी पाणी, वीज, रस्ते आणि सर्वांना रोजगार दिला जाईल. लोकांनी आम्हाला संधी दिली आहे. त्यानंतर आम्ही लगेच दारुबंदी केली. निवडणुकांमध्ये दिलेली आश्वासने पूर्ण केली पाहिजेत, असेही ते म्हणाले. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केले. आम्ही भ्रष्ट अधिकाऱ्यांची संपत्ती जप्त केली आहे. वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्याच्या घरात आम्ही शाळा सुरू केली. हवे तर माझे काम जाऊन पाहा, असेही ते म्हणाले. महाआघाडी कधीपर्यंत राहील, असे विचारले असता, महाआघाडी पुढील पाच वर्षे कायम राहील. त्यावर प्रश्न उपस्थित करणे पूर्णपणे चुकीचे आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष एकत्र आले तर महाआघाडी, पण बिहारच्या बाहेर कुठेही महाआघाडी नाही, असेही नितीशकुमार यांनी यावेळी स्पष्ट केले. संयुक्त जनता दल (जेडीयू) राष्ट्रीय पक्ष बनवण्याचे स्वप्न आहे, असेही ते म्हणाले. बिहारमधील दारुबंदीबाबतही ते यावेळी बोलले. राज्यात दारुबंदी केल्याने जनता खूश आहे. दारुबंदीच्या निर्णयाचे जनतेने स्वागत केले आहे. अवैध दारू काळ्या पैशाचे सर्वात मोठे स्रोत आहे, असा दावाही त्यांनी यावेळी केला.