जगभरातील युद्धांसाठी ख्रिश्चन आणि मुस्लिमच कारणीभूत असतात असे वादग्रस्त विधान करुन  विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल यांनी  वादात भर टाकली आहे.  ‘आम्ही धर्म परिवर्तन करण्यासाठी नाही तर मनं जिंकण्यासाठी निघालो आहोत,’ असेही ते म्हणाले.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सिंघल यांनी हिंदुत्ववादी संघटनांकडून सुरू असलेल्या धर्मांतराच्या ‘घर वापसी’ मोहिमेची पाठराखण केली आहे. मुस्लिम आणि ख्रिश्चन हे युद्धातील आघाडीचे खेळाडू आहेत. पण हिंदू त्याच्यापेक्षा वेगळा आहे, असे सांगून, ‘सध्या जग इस्लामी दहशतवादाच्या सावटाखाली आहे,’ असे ते म्हणाले. भाजपा तसेच संघ परिवारीतल विविध संघटनांच्या नेत्याकंडून सातत्याने वादग्रस्त विधाने होत असल्याने मोदी सरकारपुढील अडचणींमध्ये वाढ झाली असताना आता सिंघल यांच्या खळबळजनक विधानाने नवा वाद पेटण्याची चिन्हे आहेत.