काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिंदबरम यांनी नागरोटा हल्ल्यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्या इतकाच नागरोटा हल्ला लाजिरवाणा असल्याची टीका त्यांनी केली आहे. त्याचबरोबर सर्जिकल स्ट्राईकमुळे सीमेपलिकडून होणार दहशतवाद थांबवता येत नसल्याचेही त्यांनी ठासून सांगितले. माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन यांच्या 'चॉइसेस: इनसाईड द मेकिंग ऑफ इंडियाज फॉरेन पॉलिसी'च्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. सध्या गृहमंत्रालयात एकवाक्यता नसल्याचाही टोला त्यांनी या वेळी लगावला. मुंबईवर २६/११ रोजी झालेला दहशतवादी हल्ला हा देशासाठी अत्यंत लाजिरवाणा असा होता. नागरोटावरील लष्करी तळावर झालेला हल्ला ही तितकाच लाजिरवाणा होता. सीमेपलिकडून पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद्यांना सर्जिकल स्ट्राईकद्वारे रोखता येणार नाही, असे त्यांनी या वेळी म्हटले. जर तुम्ही असं केलं तर आम्हीही असं करू शकतो, अशा प्रकारचा वेगळाच संदेश सर्जिकल स्ट्राईकमुळे जातो, असेही ते म्हणाले. खरं सांगायचं म्हटलं तर अशा कारवाईमुळे दहशतवाद संपवता येऊ शकत नाही, असे सांगत शेजारील देशाबरोबर सर्जिकल स्ट्राईकपेक्षा चर्चेनेच संबंध सुधारता येतील, असा टोलाही लगावला. ३० नोव्हेंबर रोजी जम्मू काश्मीरमधील नागरोटा येथील लष्कराच्या दोन तळांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. नागरोटा येथील एका तळावर दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकत लष्कराच्या युनिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर जवानांनी त्यांना प्रत्युत्तर देत त्यांना आत येण्यापासून रोखले होते. या हल्ल्यात लष्कराचे दोन अधिकारी आणि तीन जवान शहीद झाले होते. लष्कराच्या प्रत्युत्तरात तीन दहशतवादी ठार झाले होते. नागरोटा हे ठिकाण जम्मूपासून २० किलोमीटर अंतरावर आहे. येथे १६ कॉर्प्सचे मुख्यालय आहे. उरी येथील लष्करी तळावर १८ सप्टेंबर रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैनिकांनी २९ सप्टेंबर रोजी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केले होते. त्यावेळी भारतीय जवानांनी दहशतवाद्यांचे सुमारे ७ ते ८ तळ नष्ट केले होते. या कारवाईत ३० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.