पठाणकोट हवाई हल्ल्याच्या संयुक्त तपासांतर्गत पाकिस्तानी अधिकाऱ्यांचे पथक आज पठाणकोट हवाई तळाला भेट देणार आहे. त्यामुळे दिल्लीत मोठे राजकीय वादळ उद्भवण्याची शक्यता आहे. सध्या हे पथक अमृतसर विमानतळावर दाखल झाले असून त्यांना आता बुलेटप्रुफ गाड्यांनी पठाणकोट येथे नेण्यात येणार आहे.

हे पथक भारतात दाखल झाल्यापासूनच विरोधकांनी सरकारला टीकेचे लक्ष्य करण्यास सुरूवात केली होती. दरम्यान, काल संरक्षण मंत्रालयाने या पथकाला पठाणकोट हवाईतळावर जाण्यास मज्जाव केला होता. मात्र, आज हे पाकिस्तानी पथक नियोजित कार्यक्रमानुसार पठाणकोटला जाणार आहे. यासंदर्भात बोलताना संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर म्हणाले की, तळावरील घटना घडलेला परिसर लोखंडी जाळ्यांनी बंदिस्त करण्यात आला असून तो तपासणीच्या अनुषंगाने सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) ताब्यात आहे. त्यामुळे त्याठिकाणी कोणाला येऊन द्यायचे हा निर्णय सर्वस्वी त्यांचा आहे. तसेच पठाणकोट तळावर पाकिस्तानी पथक झाल्यानंतर त्यांच्या सुविधेसाठी संरक्षण खात्याची कोणतीही सामुग्री वापरण्यात येणार नसल्याचेही पर्रिकर यांनी स्पष्ट केले.
पाकचे तपास पथक भारतात
या पथकात आयएसआयच्या एका अधिकाऱ्यासह पाच अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पंजाबच्या दहशतवादविरोधी विभागाचे (सीटीडी) प्रमुख व अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक मोहम्मद ताहीर राय यांच्या नेतृत्वातील पाच सदस्यांच्या या पथकात लाहोर येथील गुप्तचर विभागाचे उपमहासंचालक मोहम्मद अझीम अर्शद, आयएसआयचे अधिकारी लेफ्टनंट कर्नल तन्वीर अहमद, लष्करी गुप्तचर विभागाचे ले.क. इरफान मिर्झा आणि गुजरानवाला येथील सीटीडीचे तपास अधिकारी शाहीद तन्वीर यांचा समावेश आहे.
नरेंद्र मोदींनी पाकसमोर शरणागती पत्कारली- केजरीवाल