भारतीय सैन्याच्या गोळीबारात एकाही जवानाचा मृत्यू झालेला नाही, असा दावा पाकिस्तानच्या लष्कराने केला आहे. पाकिस्तानी सैन्याला दिलेल्या प्रत्युत्तरात १५ रेंजर्सचा खात्मा केल्याची माहिती भारतीय लष्कराकडून देण्यात आली होती. मात्र भारतीय सैन्याचा हा दावा चुकीचा असल्याचे पाकिस्तानच्या लष्कराने म्हटले आहे. 'पाकिस्तानच्या सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्यावर भारतीय सैन्याकडून जशास तसे प्रत्युत्तर देण्यात आले. भारतीय सैन्याने केलेल्या गोळीबारात १५ पाकिस्तानी रेंजर्स ठार झाले. तर पाकिस्तानच्या गोळीबारात दोन नागरिकांचा मृत्यू झाला आणि दोन जण जखमी झाले', अशी माहिती सीमा सुरक्षा दलाकडून शुक्रवारी देण्यात आली. सीमा सुरक्षा दलाचा १५ पाकिस्तानी रेंजर्स टिपण्यात आल्याचा दावा पाकिस्तानी लष्कराने खोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे. '१५ पाकिस्तानी रेंजर्सना टिपल्याचा भारतीय सैन्याचा दावा तथ्यहीन आहे. हा दावा संपूर्णपणे खोटा आहे,' असे पाकिस्तानच्या इंटर सर्विसेस पब्लिक रिलेशनने म्हटले आहे. 'आपले झालेले नुकसान लपवण्यासाठी भारताकडून हा दावा करण्यात येत आहे. काश्मीर प्रश्नावरुन लक्ष हटवण्यासाठी भारताकडून अशा प्रकारचे दावे केले जातात,' असे म्हणत सीमा सुरक्षा दलाचा दावा खोटा ठरवण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून करण्यात येतो आहे. 'तोफगोळे आणि स्वयंचलित शस्त्रात्रांचा वापर करत पाकिस्तानी सैन्याने भारतीय चौक्यांवर गोळीबार केला. आंतरराष्ट्रीय सीमेवरील भारताच्या चौक्यांना पाकिस्तानी सैन्याने लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. जम्मू, कठुआ, पुंछ, राजौरी या भागात पाकिस्तानने मोठा गोळीबार केला. या गोळीबाराला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले. यामध्ये १५ पाकिस्तानी रेंजर्स मारले गेले,' अशी माहिती सीमा सुरक्षा दलाकडून देण्यात आली आहे.