पाकिस्तानला अनेकदा सडेतोड जबाब देण्यात आलेला असतानाही त्यांच्या वर्तनात फरक पडत नसल्याची टीका केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केली आहे. पाकिस्तानस्थित दहशतवादी भारतात हल्ले करण्याची योजना आखत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे त्याबाबत गृहमंत्र्यांनी वरील प्रतिक्रिया दिली. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा भारतभेटीवर येणार असून त्यापूर्वी जम्मू-काश्मीरमधील काही ठिकाणांना लक्ष्य करण्याचा कट रचण्यात आल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. मात्र भारत असल्या धमक्यांना भीक घालत नाही, असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले. दहशतवाद्यांचे मनसुबे उधळून लावण्यासाठी प्रयत्नात कसूर केली जाणार नाही, असेही ते म्हणाले.