पाकिस्तानने इस्लामाबादमध्ये नियोजित सार्क शिखर परिषद पुढे ढकलली आहे. परिषदेच्या नविन तारखा लवकरच जाहीर करणार असल्याचे देखील पाकिस्तानकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाकिस्तानमध्ये होणाऱ्या सार्क परिषदेत सहभागी होणार नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी सांगितले होते. सीमेवर दहशतवादी हालचाली वाढत आहेत. देशातील अंतर्गत मुद्यांवरही वारंवार हस्तक्षेप केला जातोय. अशा परिस्थितीत इस्लामाबादमध्ये होणाऱ्या बैठकीत भारत सहभागी होणार नसल्याचे  सरकारकडून स्पष्ट करण्यात आले होते.

इस्लामाबादमध्ये होऊ घातलेल्या १९व्या ‘सार्क’ परिषदेतून श्रीलंकेनेही अंग काढून घेतले आहे. भारताने या परिषदेत सहभागी होण्याबाबत असमर्थता दर्शवल्यानंतर असे करणारा श्रीलंका हा पाचवा देश आहे. यापूर्वी भारताशिवाय बांगलादेश, अफगाणिस्तान व भूतान या ‘सार्क’ सदस्यांनीही ही परिषद यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी योग्य वातावरण नसल्याबद्दल अप्रत्यक्षरीत्या पाकिस्तानला दोष देऊन परिषदेत भाग घेण्यास नकार दिला आहे. भारत व पाकिस्तान यांच्यातील सध्याच्या तणावाचा काहीही संदर्भ या निवेदनात देण्यात आलेला नसला, तरी त्यात ‘सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निषेध’ करण्यात आला आहे.