भाजपप्रणित रालोआचे उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील उमेदवार व्यंकय्या नायडू यांनी रविवारी पाकिस्तानवर हल्लाबोल केला. दहशतवाद मानवतेचा शत्रू असून दहशतवादाला धर्म नसतो असे सांगतानाच नायडू यांनी पाकलाही खडसावले. दहशतवादाला आश्रय देणाऱ्या शेजारी राष्ट्रांनी १९७१ च्या युद्धात काय झाले होते हे विसरु नये असा सूचक इशाराच नायडूंनी पाकला दिला आहे. दिल्लीत रविवारी 'कारगिल पराक्रम परेड'चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात नायडूंनी संबोधित केले. नायडू म्हणाले, दहशतवाद हे पाकिस्तानचे धोरण बनले असून ही दुर्दैवी गोष्ट आहे. आम्हाला शेजारी राष्ट्रांसोबत मतभेद मान्य आहेत. पण दहशतवाद आम्ही कदापी सहन करणार नाही असे त्यांनी सांगितले. दहशतवाद मानवतेचा शत्रू असून दहशतवादाला धर्म नसतो. भारताच्या शेजारी राष्ट्रांनी दहशतवादाला आश्रय देऊन काही मिळणार नाही हे लक्षात घेतले पाहिजे. १९७१ च्या युद्धात काय झाले ते विसरु नका अशी आठवण नायडूंनी पाकला करुन दिली. पाकिस्तानकडून सीमा रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याचे प्रमाण वाढत असताना आणि घुसखोरीच्या घटना वाढत असताना नायडूंनी हे विधान केले आहे. या महिनाभरात पाकने १८ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकच्या गोळीबारात ११ जणांचा मृत्यू झाला असून १८ जण जखमी झाले आहेत. तर २२ वेळा घुसखोरीचा प्रयत्न झाला होता. मे-जून १९९९ मध्ये कारगिलमध्ये भारतीय जवानांनी दाखवलेल्या धाडसाचे त्यांनी कौतुक केले. 'भारत हा शांतताप्रिय देश असून आम्हाला युद्ध नको आहे. पण जेव्हा देशातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न झाला त्यावेळी भारताच्या शूर जवानांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले' असे नायडूंनी सांगितले.