भारत-पाक यांच्यातील आंतरराष्ट्रीय सीमाभागात भारतावर नजर ठेवण्यासाठी पाकिस्तानकडून चीनी बनावटीचे कॅमेरे लावण्यात आले आहेत. राजस्थानजवळच्या सीमाभागातील पश्चिम भागात पाकिस्तानने हे सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर ५०० मीटरच्या परिसरात कुठलीही वस्तू बसवणे बेकायदेशीर आहे. या प्रकारामुळे अनेक आंतरराष्ट्रीय नियम आणि अटींचे उल्लंघन झाले असून पाकच्या भूमिकेविषयी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सीमारेषेपासून २०० ते ३०० मीटरच्या परिसरात लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यांवर भारतीय लष्कराने आक्षेप घेतला आहे. रशियामध्ये शुक्रवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यात झालेल्या चर्चेनंतर द्विपक्षीय संवादाला पुन्हा एकदा सुरूवात झाली होती. मात्र, पाकच्या या नव्या कुरापतीमुळे भारत-पाक संबंधात पुन्हा अडथळा येण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे सीमाभागात लावण्यात आलेले हे सर्व कॅमेरे चीनी बनावटीचे आहेत. त्यांची बॅटरी संपू नये म्हणून त्यांच्यासोबत सोलर पॅनलही बसविण्यात येत आहे. या कॅमेऱ्यांमुळे पाकला एक किलोमीटरपर्यंतच्या परिसरातील हालचालींवर लक्ष ठेवता येणार आहे.