शिक्षण, कामगार धोरण, पर्यावरण, भू-संपादन यांसारख्या मुद्दय़ांवरून केंद्र सरकारवर व परिवारातील संघटनांमध्ये सुरू असलेल्या वादावर ‘समन्वय’ साधण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आयोजित केलेल्या तीनदिवसीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रातील प्रमुख खात्यांचे मंत्री उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री अरुण जेटली, दळणवळणमंत्री नितीन गडकरी, संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर, वाणिज्यमंत्री निर्मला सीतारामन, पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर या बैठकीत उपस्थित राहतील. मंत्र्यांच्या सोयीनुसार त्यांना उपस्थित राहण्याची मुभा देण्यात आली आहे.    रालोआच्या पहिल्या कार्यकाळात संघ परिवार व सरकारमध्ये समन्वय साधण्यात अपयशी ठरलेली ‘एकल नेतृत्व’ योजना संघाने बदलली आहे. कुणा एका संघाच्या पदाधिकाऱ्याऐवजी दोन जणांकडे समन्वयाचे काम सोपविण्यात आले आहे.  सह सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे, कृष्णगोपाल हे समन्वयाचे काम पाहतात. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना संघाचे तत्कालीन सरकार्यवाह मदनदास देवी यांच्याकडे समन्वयाचे काम होते. मात्र सरसंघचालक के. सुदर्शन व वाजपेयी यांचे सदैव मतभेद राहिले. त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी संघाने एकापेक्षा जास्त अधिकाऱ्यांकडे समन्वयाची जबाबदारी दिली आहे. बुधवारपासून होणाऱ्या बैठकीत परिवारातील संघटना व  संबधित खात्याच्या मंत्र्यांशी स्वतंत्रपणे चर्चा होईल. ज्यात धोरणात्मक बाबींवर चर्चा करण्यात येईल.