वैज्ञानिकांनी वनस्पतींच्या प्रकाश संश्लेषण क्रियेत हस्तक्षेप करून त्यांची उत्पादन क्षमता वाढवली असून त्यासाठी या प्रक्रियेतील तीन प्रथिनांची पातळी वाढवण्यात आली. संगणकीय विश्लेषणाच्या आधारे व काही प्रयोगानुसार यात विशिष्ट प्रथिनांचे प्रमाण वाढवण्यात आले. यात तंबाखूच्या वनस्पतीचा वापर करण्यात आला कारण त्यात सुधारणा लवकर करता येतात. इतर पिकात हा दृष्टिकोन किंवा युक्ती उपयोगी ठरू शकेल की नाही हे आम्ही सांगू शकत नाही पण आमची ही प्रक्रिया सामायिक स्वरूपाची असल्याने ती सर्व पिकात उपयोगी ठरेल असा दावा इलिनॉइस विद्यापीठातील प्राध्यापक स्टीफन लाँग यांनी केला आहे. संशोधकांनी वनस्पतींचे जादा सूर्यप्रकाशापासून संरक्षण करणाऱ्या प्रक्रियेवर लक्ष केंद्रित केले होते. जेव्हा वनस्पतींच्या पानांवर जास्त सूर्यप्रकाश पडतो तेव्हा त्या सर्व प्रकाशाचा वापर करतात. त्यांना जादा ऊर्जेचा उपयोग नसेल तर त्यामुळे पानांचे ब्लिचिंग होते, ती पांढरी पडू लागतात. पण यात त्या नॉनफोटोकेमिकल क्वेचिंग प्रक्रियेने त्यांचे रक्षण करून जादा ऊर्जा बाहेर टाकतात. सावलीत प्रकाश संश्लेषण क्रिया मंद होते पण नॉनफोटोकेमिकल क्वेचिंग प्रक्रियेने जादा ऊर्जा तयार होते. वैज्ञानिकांनी महासंगणक वापरून एनपीक्यू प्रक्रियेतून बाहेर पडण्याच्या काळात पिकांची उत्पादनशीलता दिवसाला किती कमी होते याचा अंदाज घेतला त्यानुसार पिकांची उत्पादनक्षमता ७.५ ते ३० टक्के कमी होते ते वनस्पतीचा प्रकार व तापमान यावर अवलंबून असते असे लाँग यांनी सांगितले. तीन प्रथिनांचे प्रमाण वाढवल्यास वनस्पती एनपीक्यू प्रक्रि येतून लवकर बाहेर येते. त्यासाठी अर्बिडोप्सिस वनस्पतीची तीन जनुके तंबाखूच्या रोपात टाकण्यात आली त्यामुळे या प्रथिनांचे प्रमाण वाढून वनस्पती एनपीक्यू प्रक्रियेतून वनस्पती लवकर बाहेर येते असे दिसून आले. शेतात केलेल्या प्रयोगानुसार तंबाखूच्या उत्पादनात १४ ते २० टक्के वाढ झाल्याचे दिसून आले. सायन्स नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.