नागालॅण्डमधील घुसखोरी थांबविण्याच्या उद्दिष्टाने सोमवारी सरकारने एनएससीएन (आयएम) या बंडखोर संघटनेशी करार केला. राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी उचलण्यात आलेले हे एक ऐतिहासिक पाऊल असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. पंतप्रधान मोदी यांच्यासह गृहमंत्री राजनाथसिंह,राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवल आणि संघटनेचे नेते टी. मुइवा आणि सरकारचे मध्यस्थ आर. एन. रवी या वेळी उपस्थित होते. जवळपास १६ वर्षांपासून सुरू असलेल्या चर्चेच्या जवळपास ८० हून अधिक फेऱ्या झाल्या. एनएससीएन (आयएम) हा नागा बंडखोरांचा सर्वात मोठा गट असून त्यांनी शस्त्रसंधीचे पालन केले. मात्र एस. एस. खापलांग यांच्या नेतृत्वाखालील अन्य गट अद्यापही हिंसाचार घडवीत आहेत. मणिपूरमध्ये लष्करावर प्राणघातक हल्ला करण्यात आला त्यामागे खापलांग गटाचाच हात होता, असा संशय आहे. तथापि, मणिपूर, अरुणाचल प्रदेश आणि आसाममधील सर्व नागा प्रभागांचे ऐक्य करण्याची मुख्य मागणी मान्य करण्यात आली आहे किंवा नाही ते त्वरित कळू शकले नाही. लवकरच र्सवकष योजना जाहीर केली जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. सदर करार होण्यात अजित दोवल यांनी मध्यवर्ती भूमिका पार पाडली. सदर करार ऐतिहासिक असल्याचे मत नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. या करारामुळे आम्ही केवळ समस्येवरच मात केली नाही तर नव्या पर्वाची नांदी सुरू झाली आहे, असे मोदी म्हणाले. केवळ जखमा भरण्याचा आणि समस्या सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आलेला नाही तर तुमचा स्वाभिमान आणि प्रतिष्ठा यांच्यातही सहभागी होण्याचा प्रयत्न केला आहे, असेही मोदी म्हणाले. सरकार आणि नागा आता नव्या संबंधाने जोडले गेले आहेत, मात्र आता सुरूवात झाली असून आमच्यासमोरील आव्हाने मोठी आहेत, असे नागा नेते मुइवा म्हणाले.