शहीद पतीच्या पावलांवर पाऊल टाकून नुकत्याच भारतीय सैन्यात दाखल झालेल्या लेफ्टनंट स्वाती महाडिक आणि लेफ्टनंट निधी दुबे या असामान्य वीरांगणा आहेत, अशा गौरवपूर्ण शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे कौतूक केले. ते आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्यक्रमात बोलत होते. आजच्या ३६व्या भागानंतर या कार्यक्रमाला तीन वर्षे पूर्ण झाली.

मोदी म्हणाले, कर्नल संतोष महाडिक आणि नाईक मुकेश दुबे या भारताच्या सुपूत्रांनी देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या वीरपत्नींनी देखील त्यांच्यासारखेच धाडस दाखवले असून अनेक अडचणींवर मात करीत दृढनिश्चय आणि देशभक्तीच्या जोरावर त्या भारतीय सैन्यदलात दाखल झाल्याबद्दल त्यांचे मी अभिनंदन करतो, असे पंतप्रधान म्हणाले.

मोदी पुढे म्हणाले, ‘विविधतेत एकता’ ही केवळ एक घोषणा नाही. तर, आपल्यातील मोठ्या शक्तीचा भांडार आहे. ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’चे स्वप्न यामध्ये सामावले आहे. तुम्ही कधी भारतातील या विविधतेला अनुभवले आहे का? असा सवाल तरुणांना करताना हा अनुभव तुम्ही नक्कीच घ्यायला हवा. तो तुम्हाला बरेच काही शिकवेन असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणांना दिला आहे.

स्वच्छ भारत कार्यक्रमावर बोलताना मोदी म्हणाले,  ही आता चळवळ झाली आहे. त्यामुळे शहर-ग्रामीण भागातील ज्येष्ठ, तरुण, पुरुष, महिला अशा प्रत्येकाने या मोहिमेचा भाग व्हायला हवं. आता सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर एक प्रकारचा दबाव निर्माण व्हायला हवा. आता कोणी सार्वजनिक ठिकाणी कचरा करत असेल तर लोक त्याला विरोध करू लागले आहेत. त्यामुळे ही स्वच्छता मोहीम आता ‘संकल्प से सिद्धी’पर्यंत पोहोचल्याचे ते म्हणाले.

आपल्या स्वच्छ भारत अभियानाचा दाखला देताना जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर पालिकेने स्वच्छता अभियानासाठी ब्रँड अॅम्बेसेडर बनवलेल्या बिलाल दार या तरुणाचा आवर्जून उल्लेख केला. बिलाल हा मुलगा येथील प्रसिध्द ‘दल सरोवरा’त साठलेला कचरा काढण्याचे काम करतो. वर्षभरात तो या सरोवरातील १२ हजार किलो कचरा काढून पाण्याचा स्त्रोत स्वच्छ ठेवतो. या तरुणाच्या कामाची पालिकेने स्वच्छता मोहिमेत दखल घेतल्याबद्दल मोदींनी आनंद व्यक्त केला. बिलाल गेल्या ५ ते ६ वर्षांपासून म्हणजे वयाच्या १२ व्या वर्षांपासून स्वच्छतेसाठी कार्यरत आहे.

भारतातील पर्यटनाबाबत बोलताना मोदी म्हणाले, लोकांनी केवळ भेट देण्यासाठी म्हणून पर्यटनस्थळांकडे न पाहता अभ्यासाच्या दृष्टीने पाहायला हवे. यासाठी त्यांनी आपले स्वतःचे उदाहरण दिले. ते म्हणाले, मी देशातील ५०० जिल्ह्यांना भेटी दिल्या, त्यांचा अभ्यास केला. त्यामुळे पंतप्रधानपदाची जबाबदारी खांद्यावर घेतल्यानंतर त्याचा मला खूपच फायदा झाला.

त्याचबरोबर लोकांनी केवळ बदल म्हणून फिरायला जाऊ नये. उलट लोकांनी त्यांचे अनुभव, छायाचित्रे mygov आणि नरेंद्र मोदी अॅपच्या माध्यमातून #Incredible India या हॅशटॅगद्वारे माहिती द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. प्रत्येकाने आपल्या राज्यातील सर्वोत्कृष्ट सात पर्यटनस्थळांची यादी तयार करावी, आणि शक्य झाल्यास त्या ठिकाणांना भेटी द्याव्यात, असे आवाहनही यावेळी मोदींनी केले.