पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील जनतेची ‘मन की बात’ न ऐकता स्वत:ची ‘मन की बात’ देशावर लादतात, अशा शब्दांमध्ये काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला. ‘मोदींना देशातील जनतेच्या ‘मन की बात’ ऐकायची नाही. मोदी केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी चर्चा करुन देश चालवत आहेत,’ अशा शब्दांमध्ये राहुल गांधी यांनी मोदींवर घणाघाती टीका केली.

‘पंतप्रधान मोदी केवळ त्यांची ‘मन की बात’ देशातील जनतेला ऐकवतात. लोकसभा, विधानसभांमध्ये कोणतीही चर्चा होऊ नये, असे मोदी यांना वाटते. मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत चर्चा करुनच देश चालूव पाहत आहेत. काँग्रेस आणि भाजपमध्ये हाच फरक आहे. काँग्रेसला देशातील सर्वांचा आवाज राजकारणात आणायचा आहे. मात्र भाजपला सर्वसामान्यांचा आवाज राजकारणात नको आहे,’ अशा शब्दांमध्ये राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले.

‘देशातील सर्व जनतेचा धोरण आखणीच्या प्रक्रियेत सहभाग असावा, असे काँग्रेस पक्षाला वाटते. त्यामुळेच यासाठी एक नवी आघाडी पक्षाकडून सुरु करण्यात येणार आहे. धोरण आखणीच्या प्रक्रियेत देशातील कोट्यवधी जनता सहभागी व्हावी, यासाठी प्रोफेशनल काँग्रेसची निर्मिती केली जाणार आहे,’ असे राहुल गांधी यांनी सांगितले. ‘काँग्रेस पक्षाकडून असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी प्रोफेशनल काँग्रेसची उभारणी केली जाणार आहे. या माध्यमातून असंघटित कर्मचाऱ्यांचा आवाज राजकारणात पोहोचणार आहे,’ असेही त्यांनी सांगितले. प्रोफेशनल काँग्रेसची धुरा चार वरिष्ठ काँग्रेस नेत्यांकडे असणार आहे. यामध्ये शशी थरुर आणि मिलिंद देवरा यांचा समावेश असेल.

असंघटित कामगार वर्गापर्यंत पोहोचण्यासाठी काँग्रेसकडून ‘प्रोफेशन काँग्रेस’ची उभारणी करण्यात येणार आहे. असंघटित कर्मचाऱ्यांना राजकारणात आणण्यासाठी काँग्रेसकडून या आघाडाची निर्मिती केली जाणार आहे. राहुल गांधी यांच्या पाठोपाठ शशी थरुर यांनीही असंघटित कर्मचारी वर्गाला एकत्र आणण्याची गरज व्यक्त केली आहे.