पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा एकदा ‘मन की बात’च्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला. या वेळीही त्यांनी विविध विषयांना स्पर्श केला. सध्या मुलांच्या परीक्षा संपल्या आहेत. परीक्षा संपून सुट्या लागल्याने सर्वजण आनंदी आहेत. परंतु मला सध्याच्या युवकांविषयी एक चिंता सतावत आहे. आजच्या युवा पिढीला कम्फर्ट झोनमध्ये (आरामात) जगण्याची सवय लागली आहे. आई-वडिलांच्या पांघरूणाबाहेर या, असा सल्ला देत या सुटीत काहीतरी नवीन करण्याचा, नवे जाणून घेण्याचा युवकांनी प्रयत्न करावा, असे आवाहन मोदी यांनी केले. ‘मन की बात’चा आजचा ३१ वा भाग होता.

मोदी म्हणाले, युवकांनी यावेळच्या सुटीत काही नवीन शिकण्याचा प्रयत्न करावा, नवीन ठिकाणी जावे, नवीन अनुभव घ्यावा. आरक्षण न करता एखादा प्रवास रेल्वेच्या द्वितीय श्रेणीच्या डब्यातून करावा. यातील प्रवाशांशी चर्चा करा, त्यांच्या अडचणी जाणून घ्या, पाहा कसं वाटतं ते. एका सांयकाळी गरीब वस्तीतील मुलांबरोबर खेळण्यासाठी जा. त्यांचा आनंद पाहा. असे अनुभव घेतच आपले जीवन घडते. यातूनच नवीन शिकायला मिळते, असेही त्यांनी म्हटले.

तंत्रज्ञानाने जागतिक अंतर कमी झाले असले तरी कुटुंबातील अंतर मात्र वाढले आहे. एकाच घरातील सहा लोक एकाच खोलीत असून ते एकमेकांपासून दूर असतात, याची आपल्याला चिंता असल्याचे ते म्हणाले. जीवनात खूप काही करण्याचे स्वप्न पाहिले पाहिजे. तंत्रज्ञानापासून दूर जाऊन संगीतातील एखादे नवे वाद्य शिकावे, भाषा शिकावी, पोहायला येत नसेल तर ते शिकावे. अशा गोष्टींमुळे तुमच्यातील संवेदना जागृत राहतात असे सांगत नेहमी ‘आऊट ऑफ बॉक्स’ विचार करण्याचे आवाहन त्यांनी केले.

या सुटीत युवकांनी इतरांना भीम अॅप वापरण्याबाबत प्रोत्साहित करावे, त्यांना त्याचे ज्ञान द्यावे. या माध्यमातून त्यांना उत्पन्न मिळवण्याचीही संधी मिळेल, असे त्यांनी सांगितले. या वेळी त्यांनी बदलत्या हवामानावरही भाष्य केले. तसेच एक मे रोजी महाराष्ट्र व गुजरातच्या स्थापनादिनाच्या शुभेच्छाही दिल्या. संत रामानुजाचार्य यांच्या एक हजाराव्या जयंतीनिमित्त डाक तिकिटाचे प्रकाशन करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. एक मे रोजी असलेल्या कामगार दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या व डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा बसवेश्वर यांच्या योगदानाबद्दल माहिती दिली.
गत मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी देशाच्या विकासातील सर्व देशवासियांच्या योगदानाचा उल्लेख केला होता. देशातील सव्वाशे कोटी लोकांमध्ये असलेली बदलाची इच्छा, त्यांचे प्रयत्न यामुळे नवीन मजबूत भारत बनत असल्याचे त्यांनी म्हटले होते.

 

Live Updates:

– बुद्धांचे विचार अंमलात आणायचे प्रयत्न करा-पंतप्रधान मोदी

– संत रामानुजाचार्य यांच्यावर केंद्र सरकार पोस्ट तिकिट सादर करणार-पंतप्रधान मोदी

– महाराष्ट्र व गुजरातच्या स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा- पंतप्रधान मोदी

–  वाया जाणाऱ्या अन्नाबद्दल मला सुचवण्यात आले होते. मन की बात कार्यक्रमात त्याचा उल्लेख केल्यानंतर खूप मोठा फरक पडला आहे. – पंतप्रधान मोदी