उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान व उत्तराखंड या पाच राज्यांमधील पुराच्या चिघळणाऱ्या स्थितीबाबत चिंता व्यक्त करतानाच, या पूरग्रस्त राज्यांना मदत व बचाव कार्यात केंद्राकडून सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी दिले. पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार व मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याशी दूरध्वनीवरून बोलणे केल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. गृहमंत्री राजनाथ सिंह हे परिस्थितीवर काळजीपूर्वक लक्ष ठेवून असून पाच राज्यांमधील मदत व बचाव मोहिमांचा आढावा घेण्यासाठी या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बोलले आहेत, असे पंतप्रधानांनी सांगितले. उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान व उत्तराखंड या राज्यांमधील पुराचा फटका बसलेल्या भागातील लोकांच्या सुरक्षिततेसाठी मी प्रार्थना करतो. या ठिकाणच्या मदत व बचाव कार्यात केंद्र सरकार संपूर्ण मदत करेल अशी मी हमी देतो. पूरग्रस्त भागातील परिस्थिती लवकरच सामान्य होईल अशी मी आशा करतो, असे मोदी यांनी एका ट्वीटमध्ये सांगितले. मुसळधार पावसाने मध्य प्रदेशच्या पश्चिम भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पश्चिम बंगाल, बिहार व उत्तर प्रदेशातील लगतच्या जिल्ह्य़ांमध्ये गंगा नदीने रविवारी धोक्याची पातळी ओलांडली असून, यमुनाही ओसंडून वाहत आहे. राजस्थानमध्ये जोरदार पर्जन्यवृष्टीने पूरजन्य परिस्थिती उद्भवली असून त्यात आतापर्यंत सहा जणांचे बळी गेले आहेत.