निवडणूक आयोगाची सर्व राजकीय पक्षांना सूचना राजकीय पक्षांचे काही नेते धार्मिक मुद्दय़ांना उकरून काढत आचारसंहितेचे उल्लंघन करत असल्याचे निवडणूक आयोगाला आढळून आले आहे. त्यामुळे संबंधित सर्व पक्षांनी आपले नेते आणि कार्यकर्त्यांना योग्य त्या सूचना देण्याबाबत आयोगाने राजकीय पक्षांना पत्र लिहले आहे. पोटनिवडणुकीदरम्यान राजकीय पक्षांचे कार्यकर्ते लोकांना मत मागताना धर्मिक वा सांप्रदायिक मुद्दय़ावर आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. मात्र त्यामुळे आचारसंहितेचे उल्लंघन होते, असे मत निवडणूक आयोगाने व्यक्त केले आहे. नेत्यांनी समाजाच्या शांततेमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या कोणत्याही मुद्दय़ाला चालना देऊ नये अशी सूचना आपल्या सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पक्षांनी द्यावी अशी विनंती आयोगाने केली आहे. अशा प्रकारची वक्तव्ये देशाच्या कोणत्याही भागात कधीही होऊ नयेत याची काळजी पक्षांनी घ्यावी, असे २९ जूनला पक्षांना पाठवलेल्या पत्रात आयोगाने म्हटले आहे. ज्या भागामध्ये आचारसंहिता पूर्ण ताकदीने लागू होत नाही त्या ठिकाणी नेत्यांनी शब्दांचा वापर करताना विशेष दक्षता बाळगायला हवी. निवडणूक प्रक्रिया ही स्वतंत्र, नि:पक्षपाती आणि शांततापूर्ण मार्गाने व्हायला हवी. त्याबाबत लोकांच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा संदेह निर्माण होता कामा नये, असे आयोगाने म्हटले आहे. धार्मिक भाषणांचा दूगामी परिणाम याबाबत निवडणूक आयोगाने सर्व राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील पक्षांना पत्र लिहले आहे. मते मिळवण्यासाठी नेत्यांनी जर धार्मिक मुद्दय़ांचा आधार घेतला तर त्याचे दूरगामी परिणाम होणार आहेत. यामुळे संबंधित लोकसभा किंवा विधानसभा क्षेत्रातील मतदारांवर निश्चितच प्रभाव पडेल. यामुळे मुक्त आणि निष्पक्ष निवडणूक घेण्यामध्ये अडथळा निर्माण होईल.