दुसऱ्या महायुद्धाच्या काळात मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांसह इतर देशांच्या सैनिकांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पापुआ न्यू गिनी येथील बोमाना येथील ऐतिहासिक दफनभूमीत श्रद्धांजली वाहिली. मुखर्जी हे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश सैन्याबरोबर लढताना मरण पावलेल्या सैनिकांच्या स्मृत्यर्थ उभारलेल्या स्तंभाकडे चालत गेले व आदरांजली वाहिली. पापुआ न्यू गिनीचे गव्हर्नर जनरल सर मायकेल ओगियो यांच्याशी चर्चेनंचर मुखर्जी हे थेट युद्धस्मारकाकडे गेले व तेथे जवानांच्या स्मृतिस्थळावर पुष्पचक्र अर्पण केले. त्या वेळी पापुआ न्युगिनीच्या संरक्षण दलांनी बँड वाजवला. मुखर्जी यांनी जवानांच्या स्मृतिस्थळाला प्रदक्षिणा घालून श्रद्धांजली वाहिली. या स्मारकाच्या ठिकाणी राष्ट्रकुलाच्या ३८२४ जवानांवर दुसऱ्या महायुद्धाच्यावेळी अंत्यसंस्कार करण्यात आले, त्यात ६९९ अज्ञात जवान होते, एकूण अडीचशे अज्ञात जवान हे अखंड भारतातील होते. भारतीय उच्चायुक्त नागेंद्रकुमार सक्सेना यांनी दुसऱ्या महायुद्धात भारतीय जवानांनी केलेल्या कामागिरीचा उल्लेख केला.