एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत यूपीएच्या मीरा कुमार यांचा पराभव केला आहे. १ ऑक्टोबर १९४५ रोजी कानपूरच्या पाराऊख गावात जन्मलेले कोविंद देशाचे दुसरे दलित राष्ट्रपती आहेत. रामनाथ कोविंद यांचे वडिल मैकूलाल पाराऊख गावचे सरपंच होते. यासोबतच रामनाथ यांचे वडिल मैकूलाल गावात किराणा मालाचे आणि कपड्याचे दुकान चालवायचे. परिस्थितीशी संघर्ष करत रामनाथ कोविंद यांनी शिक्षण घेतले. रामनाथ कोविंद यांचे भाऊ प्यारेलाल सांगतात, 'आम्ही एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबाप्रमाणे जीवन जगत होतो. कुटुंबीयांनी सर्व सात भावंडांना शिक्षण दिले. यामध्ये पाच भाऊ आणि दोन बहिणींचा समावेश होता. यामधील एक भाऊ मध्य प्रदेशातून अकाऊंट पदावरुन निवृत्त झाले. तर आणखी एक भाऊ शाळेत शिक्षक आहे. रामनाथ कोविंद वकील झाले. बाकी सगळे आज आपापला व्यवसाय सांभाळत आहेत.' रामनाथ कोविंद यांचे सुरुवातीचे शिक्षण स्थानिक शाळेत झाले. कानपूर ग्रामीण भागातील खानपूरमधून कोविंद यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण घेतले. यानंतर उच्च शिक्षणासाठी ते कानपूर शहरात गेले. कानपूर विद्यापीठातून त्यांनी वाणिज्य आणि विधीचे शिक्षण घेतले. वकिलीचे शिक्षण घेतल्यावर कोविंद यूपीएससीच्या तयारीसाठी दिल्लीला गेले. दिल्लीत त्यांनी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात वकिली सुरु केली. केंद्रात जनता पक्षाचे सरकार आल्यावर आणि मोरारजी देसाई पंतप्रधान झाल्यावर कोविंद देसाई यांचे खासगी सचिव झाले. जनता पक्षापासून भारतीय जनसंघ वेगळा झाला आणि भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली. जनता सरकार कोसळल्यावर १९८० ते १९८३ या कालावधीत केंद्र सरकारच्या सर्वोच्च न्यायालयातील स्थायी परिषदेत त्यांचा समावेश होता. कोविंद यांनी १९९३ पर्यंत दिल्ली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात वकिली केली. जवळपास १६ वर्षे त्यांनी वकील म्हणून काम केले. दिल्लीत असताना त्यांची जनसंघाचे नेते हुकुमचंद यांच्यासोबत ओळख झाली. यामुळे कोविंद राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपशी जोडले गेले. १९९१ मध्ये भाजपने घाटमपूर लोकसभा मतदारसंघातून तिकिट दिल्यावर रामनाथ कोविंद सक्रीय राजकारणात झाले. मात्र या निवडणुकीत कोविंद यांचा पराभव झाला. लोकसभा निवडणुकीत जरी कोविंद यांचा पराभव झाला असला तरी पक्षाने अवघ्या वर्षभरातच त्यांच्याकडे राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमातीच्या मोर्चाचे अध्यक्षपद दिले. याशिवाय महामंत्री, प्रवक्ते अशी पदे देऊन भाजपने कायमच कोविंद यांच्यावर विश्वास दाखवला. १९९४ मध्ये कोविंद यांनी राज्यसभेवर पाठवण्यात आले. कोविंद यांना भाजपने दोनदा राज्यसभेवर संधी दिली. यानंतर त्यांच्याकडे बिहारचे राज्यपालपद देण्यात आले आणि आता ते थेट देशाच्या राष्ट्रपतिपदी विराजमान झाले आहेत.