आजच तो ऐतिहासिक क्षण होता जेव्हा भारतीय सैन्याने जीवाची बाजी लावून कारगिलचे युद्ध जिंकले. या विजयाचा जेव्हा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने भरून येते. आज संपूर्ण देशभरात १७ वा ‘कारगिल विजय दिवस’ साजरा केला जातोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून या युद्धात प्राण गमावलेल्या शहिदांना श्रद्धांजली वाहिली. ‘देशासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढलेल्या प्रत्येक शहिदाला मी वंदन करतो. त्यांचे बलिदान आम्हाला नेहमीच प्रेरणा देत राहील. त्यांनी धाडसाने दिलेला लढा भारत कधीच विसरणार नाही’ असेही त्यांनी ट्विटरवर म्हटले.
संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी देखील अमर जवान ज्योती येथे शहिदांना श्रद्धांजली वाहिली. तसेच लष्कर, वायुदल आणि नौदलाने देखील शहिदांना श्रद्धांजली वाहिली. जम्मू काश्मीरमधल्या द्रास सेक्टरमधील वॉर मेमोरियल येथे देखील शहीद जवानांच्या कुटुंबीयांनी हुतात्मांना आदरांजली वाहिली.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात जुलै १९९९ मध्ये कारगिल युद्ध झाले. पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवादी नियंत्रण रेषेचे उल्लंघन करून भारतात घुसले होते. १८ हजार फूट उंची आणि बर्फाळ प्रदेश अशा प्रतिकूल परिस्थितीत भारतीय सैन्याने धाडसाने शत्रूवर विजय मिळवला. मे ते जुलै असे तीन महिने हे युद्ध चालले होते. शेवटच्या श्वासापर्यंत जिकरीने लढा देत भारतीय सैन्याने कारगिलचे युद्ध जिंकले.