मध्यममार्ग सोडून काँग्रेस अतिडाव्या विचारसरणीकडे झुकल्याचा आशिष कुळकर्णींचा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या 'थिंक टँक' आणि 'वॉर रूम'मधील महत्वाचे शिलेदार असलेल्या आशिष कुळकर्णी यांनी स्वत:ला तूर्त पक्षापासून बाजूला करण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल यांच्या निकटतम वर्तुळात वावरत असलेल्या कुळकणींनी राजीनामा पत्रामध्ये काँग्रेस पक्ष मवाळ मध्यममार्ग सोडून अतिडाव्या विचारसरणीकडे झुकल्याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली. 'मध्यममार्ग हा काँग्रेसचे बलस्थान. पण अतिडाव्या विचारसरणीकडे झुकताना पक्षाने मध्यम अवकाशावर पाणी सोडले आहे. काश्मिरी फुटीरतावादी, जवाहरलाल नेहरू विद्यपीठातील आंदोलन आणि अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण यांच्याबाबत काँग्रेस आता वैचारिक आणि सांस्कृतिकदृष्टय़ा अतिडावा पक्ष झाला आहे. मार्क्सवादी किंवा तृणमूल काँग्रेससारखी हिंदूविरोधी अशी पक्षाची प्रतिमा झाली आहे,' असे कुळकर्णी यांनी राहुल यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. 'पक्ष सध्या अस्तित्वासाठी संघर्ष करीत असला तरी पक्षव्यवस्थापनेचे तीन तेरा वाजले आहेत. जमिनीवरील वस्तुस्थितीपासून पक्ष दूर गेला आहे. अजूनही पक्षाची मानसिकता उच्चभ्रू स्वरूपाची आहे. त्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांना पक्षातील नेतृत्वपदापर्यंत पोहण्याची खात्री वाटत नाही. खरी पक्षांतर्गंत लोकशाही, उमेदवारी आणि पदाधिकारी निवडीमध्ये गुणवत्तेला स्थान देण्याचे तुमचे प्रय जुन्या नेत्यांनी हाणून पाडले आहेत,' असे लिहून कुळकर्णी पुढे म्हणतात, की राहुल यांच्या नेतृत्वावर विश्वस नसल्याचे चित्र काँग्रेसचेच नेते निर्माण करतात. त्यासाठीच अधूनमधून प्रियांका गांधी यांना पक्षात आणण्याचे फलक लावले जातात. हे सगळे पक्षासाठी मारक आहे. काँग्रेस वर्तुळातून मिळालेल्या माहितीनुसार, कुळकर्णी हे '१५, गुरूद्वारा रकाब गंज' इथे असलेल्या राहुल यांच्या 'वॉर रूम'चे सक्रिय सदस्य होते. त्यांना सोनियांचे राजकीय सल्लागार अहमद पटेलांनी काँग्रेसमध्ये आणले होते. त्यापूर्वी ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याशी संबंधित होते. ‘मातोश्री’ ते काँग्रेस हाय कमांड आशीष कुळकर्णी हे शिवसेनेत असताना ‘मातोश्री’च्या जवळचे होते. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यावर ते पक्षाच्या हायकमांडच्या वर्तुळात वावरू लागले. मनोहर जोशी यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पत्र घेऊन कुळकर्णी तेव्हा ‘वर्षां’ बंगल्यावर गेले होते. २००९ आणि २०१४च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाची व्यूहरचना, मतदारसंघनिहाय माहिती जमा करणे, प्रचाराचे मुद्दे यात त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजाविली होती.