काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. मोदी केवळ १५-२० जणांसाठी काम करतात आणि बाकी सर्वाकडे दुर्लक्ष करतात, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. येथे आयोजित करण्यात आलेल्या रोड-शोदरम्यान राहुल गांधी यांचे भाषण झाले. सर्वसामान्य जनतेने मोदी यांना पंतप्रधानपदी निवडून दिले, मात्र निवडणुकीनंतर शेतकरी, दलित आणि बेरोजगार युवकांचा मोदी यांना विसर पडला, असे गांधी म्हणाले. मोदी यांना केवळ १५-२० जणांसाठीच काम करावयाचे असल्यास त्यांनी ते करावे, मात्र तुम्ही देशातील अन्य जनतेच्या हिताकडे दुर्लक्ष करू शकत नाही, मोदी सरकारने सापत्नभावाची भूमिका सोडून प्रत्येक भारतीयासाठी काम केले पाहिजे याचा काँग्रेस प्रयत्न करील, असेही ते म्हणाले. राहुल गांधी यांच्यावर सोमवारी एका रोड-शोपूर्वी बूट भिरकावण्यात आला होता, त्यामुळे त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.