पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेश दौऱ्यात भारतीयत्वाची लाज वाटण्यावरून जे विधान केले होते त्यावर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी टीका केली.
मोदी म्हणाले होते की, आपण कोणत्या जन्मात पापे केली म्हणून भारतात जन्माला आलो, असे देशात आपले सरकार येण्यापूर्वी नागरिकांना वाटत असे. त्या विधानावरून देशात बरेच वादंग माजले आहे. मोदींनी परदेशाच्या भूमीवरून देशवासीयांचा अपमान केल्याची त्यांच्यावर टीका होत आहे.
राहुल यांनीही आपला अमेठीचा तीन दिवसांचा दौरा संपवून दिल्लीकडे जाताना लखनऊ विमानतळावर बुधवारी त्याविषयी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, आपल्याला आपल्या भारतीयत्वाची कधीही लाज वाटली नाही. त्याचा अभिमान वाटत आला आहे. अन्य भारतीयांनाही तसेच वाटते. मोदींनी आपल्या विधानाने देशवासीयांचा अपमान केला आहे.