काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची दुरदृष्टी केवळ फुगे आणि चॉकलेट यांच्यापुरती मर्यादित असल्याचे सांगत छत्तीसगढचे मुख्यमंत्री रमणसिंह यांनी त्यांची खिल्ली उडविली आहे. लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने सध्या काँग्रेस आणि भाजपमध्ये वाकयुद्ध सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर रमणसिंह यांनी गांधी घराण्याचे वारसा सांगणारे राहुल राजकारणाच्या दृष्टीने अपरिपक्व असल्याची टीका केली. तसेच छत्तीसगढ विधानसभा निवडणुकीत राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला आलेल्या अपयशावर त्यांनी बोट ठेवले. या निवडणुकांत काँग्रेसचे अपयश राहुल गांधींची राजकारणातील अपरिपक्वता सिद्ध करत असल्याचे रमणसिंह यांनी सांगितले. राहुल गांधी आजपर्यंत केवळ आपल्या घराण्याचे नाव पुढे करून मते मागितल्याची टीकासु्द्धा छत्तीसगढच्या मुख्यमंत्र्यांनी केली. तसेच काँग्रेसने पंतप्रधानसाठी राहुल यांचे नाव जाहीर केल्यास आगामी लोकसभेत काँग्रेसला दोनअंकी जागांचा आकडासुद्धा गाठणे कठीण होऊन बसेल असे त्यांनी सांगितले.