सरकारमधील जवळपास तेरा आमदारांनी एकत्रितरित्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर मुंख्यमंत्री जगदीश शेट्टर यांच्या नेतृत्वाखालील कर्नाटकमधील भाजप सरकार डळमळीत झाले आहे. मात्र, आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह आणि जगदीश शेट्टर यांच्या भेटीनंतर हे सरकार आपला पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करेल असा विश्वास सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
दरम्यान, भाजपने राजीनाम्या देण्याची घोषणा केलेल्या तेरा आमदारांवर पक्षाच्या विरोधात बंड केल्याबाबत कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
कर्नाटकमधील सूत्रांच्या माहितीनुसार, के.पी.बोपाहिय्या यांच्या साथीने सदर तेरा आमदारांवर पक्ष विरोधात वर्तन केल्याबद्दल याचिका दाखल करण्यात येईल.
नवी दिल्लीत आज शेट्टर यांनी राजनाथ सिंह यांची भेट घेऊन बी.एस.येडूररप्पा यांच्याशी संपर्कात असलेल्या आमदारांवर भविष्यात काय कारवाई करता येईल याबाबत चर्चा केली.
‘सध्या एकाही आमदाराने राजीनामा दिलेला नाही. त्यामुळे वाट पाहणे हेच आमच्या हाती आहे, बघू काय होतंय’, असं शेट्टर म्हणाले.
शेट्टर पुढे म्हणाले, राजनाथ सिंह यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आज त्यांची भेट घेतली होती. दरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये दक्षिण भारतातील भाजपचे भवितव्य काय असेल, याविषयावर देखिल चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.