देशातील रेल्वेसेवेचा कायापालट करण्याच्या प्रक्रियेतील एक भाग म्हणून आता प्रत्येक रेल्वेस्थानकांवरील विश्रांतीकक्षात आणि डॉर्मेट्रीमध्ये अलिशान सुखसुविधा देण्यात येणार आहेत. त्यासाठीच जवळपास सर्वच रेल्वेस्थानकांवरील विश्रांतीकक्षांचे व्यवस्थापन 'इंडियन रेल्वे केटरिंग अॅण्ड टूरिझम कॉर्पोरेशन'कडे (आयआरसीटीसी) सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विश्रांतीकक्षाचा वापर करणाऱ्या प्रवाशांना सुंदर आदरातिथ्याचा अनुभव मिळावा, यासाठी हा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. पहिल्या टप्प्यात एकूण ६०० रेल्वेस्थानकांवरील विश्रांतीकक्षांचे आणि डॉर्मेट्रींचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. नूतनीकरणामध्ये प्रत्येक विश्रांतीकक्षात वेगवेगळ्या खोल्या, वातानुकूलन यंत्रणा, अद्ययावत फर्निचर, ब्रॅंडेड गाद्या, पडदे, बाथरूममध्ये गिझर, शॉवर अशा स्वरुपाच्या सुविधा पुरविण्यात येणार आहेत. एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये उतरणाऱ्या ग्राहकांना ज्या पद्धतीच्या सुविधा पुरविल्या जातात. त्याच स्वरुपाच्या सुविधा विश्रांतीकक्षात येणाऱ्या प्रवाशांना मिळतील, या दृष्टिने नियोजन करण्यात येत आहे. विश्रांतीकक्षात उतरणाऱ्या प्रवाशांना प्रशिक्षित मनुष्यबळाकडून विविध सेवाही पुरविल्या जातील, असे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. प्रवाशांना स्थानिक पर्यटनस्थळांना भेट देण्याची सुविधाही नव्या रचनेमध्ये उपलब्ध करून दिली जाईल. सध्या रेल्वेस्थानकांवरील विश्रांतीकक्षात मिळणाऱ्या सुविधा पुरेशा नसल्याची अनेक प्रवाशांची तक्रार आहे. त्यामुळेच अनेक प्रवासी विश्रांतीकक्षात जाऊन थांबण्यासही तयार नसतात. त्यामुळे रेल्वेने विश्रांतीकक्षांचे नूतनीकरण करण्याचे आणि तेथील सेवांचा दर्जा सुधारण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांना या ठिकाणी कोणत्या सुविधा हव्या आहेत, याचीही माहिती त्यांच्याकडून मागविण्यात येते आहे. त्याचाही नूतनीकरण करताना विचार करण्यात येणार आहे. काही तासांसाठी रेल्वेस्थानकांवर थांबवे लागणाऱ्या प्रवाशांसाठी नूतनीकरणाचा फायदाच होणार आहे. त्यासाठी त्यांना संबंधित शहरात इतर कुठे जाण्याची गरज पडणार नाही. तर एकाच छताखाली सर्व सुविधा प्रवाशांना उपलब्ध होणार आहेत.