पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दुस-यांच्या बाथरुममध्ये बघण्याची सवय आहे अशी टीका करणा-या राहुल गांधी यांना साक्षी महाराज यांनी टोला लगावला आहे. मोदींनी बाथरुममध्ये डोकावून तब्बल १३२ कोटी रुपये काढले असे खोचक टोला साक्षी महाराज यांनी लगावला आहे.

एका वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार साक्षी महाराज यांनी काळा पैसा, भ्रष्टाचार अशा विविध मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे. आमचा विकासाचा मुद्दा अजूनही बदलला नाही. सबका साथ सबका विकास हेच आमचे धोरण आहे. भारतात यापेक्षा जास्त महत्त्वाचा मुद्दा नाही. पण यामध्ये वाढती लोकसंख्या आणि लव्ह जिहाद हे दोन अडथळे असल्याचे त्यांनी सांगितले.

भ्रष्टाचार संपवण्यासाठी कोणाच्या मनात डोकावून बघावे लागेल, तर कोणाच्या बाथरुममध्येही डोकावून बघावे लागेल. काळा पैसा बाहेर काढण्यासाठी लोकांच्या घरापासून ते विदेशातील बँक खात्यांमध्येही डोकावून बघावे लागेल. मोदीजी यासाठी सर्व काही करतील असेही त्यांनी सांगितले. दुस-याच्या बाथरुममध्ये डोकावून मोदींनी १३२ कोटी रुपये काढले असा टोलाही त्यांनी लगावला.

लोकसंख्या वाढत असल्याने आता जमीनही कमी पडू लागली आहे. म्हणून लोकसंख्येवर नियंत्रण आणावे अशी माझी मागणी असल्याचे ते म्हणालेत. केंद्र सरकार आणि सुप्रीम कोर्टाचीही हीच भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राममंदिर  हा आमचा मुद्दा होता आणि यंदाही राम मंदिरचा आमचा मुद्दा कायम आहे असे त्यांनी सांगितले. आम्ही रामभक्त आहोत, जे बोलतो ते करुन दाखवतो असे त्यांनी सांगितले. अखिलेश यादव जर एकटे लढले असते तर ते लढाईमध्ये होते. पप्पूसोबत (राहुल गांधी) जाऊन अखिलेशही ‘पप्पू’ बनले आहेत असा टोलाही त्यांनी लगावला. निवडणुकीत समाजवादी पक्ष आणि काँग्रेसचे अस्तित्वच नाही. मोदींच्या भ्रष्टाचार मुक्त आणि काँग्रेस मुक्त भारतानुसार उत्तरप्रदेशही काँग्रेसमुक्त होणार असे त्यांनी सांगितले.