काळा पैशांवर निर्बंध आणण्यासाठी केंद्र सरकारने पाचशे आणि हजारच्या नोटा चलनातून रद्द केल्या. पण दुसरीकडे सरकारी बँकांनी श्रीमंत कर्जदारांवर कृपादृष्टी दाखवली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने १०० पैकी ६३ कर्जदारांचे तब्बल ७, ०१६ कोटी रुपयांचे कर्ज बुडीत असल्याची जाहीर केले आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाने कर्जबुडव्यांची एक यादी तयार केली असून यामध्ये १०० जणांचा समावेश आहे. या सर्वांनी थकवलेल्या कर्जाचे प्रमाण एकूण कर्जाच्या ८० टक्के ऐवढे आहे. बँकेच्या मोठ्या कर्जबुडव्यांचा प्रश्न गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आला आहे. किंगफिशरचे सर्वेसर्वा विजय मल्ल्याने विविध बँकांचे तब्बल ९ हजार कोटी रुपयांचे कर्ज थकवले असून यामध्ये स्टेट बँकेच्या एक हजार कोटी रुपयांचा समावेश आहे. बँकांनी कारवाईचा बडगा उगारताच विजय मल्ल्या यांनी परदेशात पलायन केले.

डीएनएने दिलेल्या बातमीनुसार एसबीआयने १०० पैकी ६३ कर्जदारांचे कर्ज बुडीत निघाल्याचे मानले आहे.  तर ३१ कर्जदारांचे कर्ज अंशतः माफ करण्यात आले आहे. सहा कर्जदारांना नॉन परफॉर्मिंग अॅसेट म्हणून जाहीर करण्यात आले आहे. ३० जून २०१६ पर्यंत एसबीआयने तब्बल ४८ हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले आहे. हे कर्ज कधीचे होते हे मात्र समजू शकलेले नाही. आता विजय मल्ल्या आणि उर्वरित ६२ कर्जदारांना एसबीआयच्या बॅलेन्सशीटमधून हटवण्यात येईल. म्हणजेच एसबीआयने या कर्जदारांकडून पैसे वसूल करण्याचे प्रयत्न बंद करण्याचे संकेत दिले आहेत. कर्जमाफी मिळालेल्या कर्जदारांमध्ये किंगफिशर एअरलाईन्स – १,२०१ कोटी, केएस ऑईल – ५९६ कोटी रुपये, सूर्या फार्मासिटीकल – ५२६ कोटी, जीईटी पॉवर – ४०० कोटी, साई इन्फो – ३७६ कोटी रुपयांचा समावेश असेल.