उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाल्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय गृहखात्याने त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे असे वृत्त डीएनएने दिले आहे. आदित्यनाथ यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रीय सुरक्षा दलातील स्पेशल कमांडो आणि शीघ्र कृती दलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. आदित्यनाथ यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती गुप्तचर विभाग आणि रिसर्च अॅंड अॅनालिसिस विंग (रॉ) ने दिली होती.

काश्मीरमधील काही दहशतवादी संघटना त्यांच्या विरोधात कट रचू शकतात अशी माहिती त्यांच्या हाती लागली होती. त्यानंतर केंद्राने हे पाऊल उचलले आहे. आदित्यनाथांच्या सुरक्षेसाठी ३५ एनएसजी कमांडो तैनात करण्यात आले आहेत. त्या व्यतिरिक्त शीघ्र कृती दलातील अधिकारी देखील त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी उचलणार आहेत. मध्य प्रदेशमधील गुप्तचर विभागाच्या हाती देखील याच प्रकारची माहिती लागली आहे. नेपाळ आणि बिहारच्या सीमेवरुन दहशतवादी उत्तर प्रदेशमध्ये घुसू शकतात आणि घातपात करू शकतात.

गुप्तचर विभागाकडून माहिती मिळाल्यानंतर दहशतवाद विरोधी पथकाने दहा संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. ताब्यात घेतलेल्या नंतर त्यांची चौकशी करण्यात आली. आम्ही एका नव्या दहशतवादी गटाचे सदस्य आहोत असे त्यांनी म्हटले. भाजपच्या काही नेत्यांना लक्ष्य करण्याचा कट होता असे त्यांनी म्हटले होते. याआधी लखनौ आणि कानपूर या शहरातून देखील काही संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. लखनौमध्ये सैफुल्लाह या दहशतवाद्याला १३ तासांच्या चकमकीनंतर ठार करण्यात आले होते. त्याठिकाणाहून तीन पिस्तुल आणि काही बॉम्ब जप्त करण्यात आले आहेत.