आसारामबापू याच्याविरुद्धच्या खटल्यातील एका प्रमुख साक्षीदारावर गुरुवारी पानिपतमध्ये हल्ला करण्यात आल्यामुळे, यापूर्वी खून करण्यात आलेला साक्षीदार अखिल गुप्ता याच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे.
आसाराम याच्याविरुद्धच्या खटल्यातील सगळ्यात महत्त्वाचा साक्षीदार असलेल्या अखिल गुप्ता याला अज्ञात हल्लेखोरांनी ११ जानेवारी २०१५ रोजी गोळ्या घालून ठार केले होते. चार महिने उलटूनही त्याच्या मारेकऱ्यांना पकडण्यात पोलीस अपयशी ठरल्यामुळे आम्ही भीतीच्या सावटाखाली राहात असल्याचे अखिलचे वडील नरेश गुप्ता यांनी म्हटले आहे. आसारामबापूचा मुलगा नारायण साई याच्याविरुद्धच्या खटल्यातील प्रमुख साक्षीदार महेंद्र चावला याच्यावर हल्लेखोरांनी बुधवारी  गोळ्या झाडल्या. यानंतर अखिल गुप्ताच्या कुटुंबीयांची सुरक्षा वाढवण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.