शीख समाज कोणत्याही स्थितीत महिलेची पूजा करू शकत नाही, त्यामुळे केवळ भारतमाता की जयच नव्हे तर वंदे मातरम्ही म्हणू शकत नाही, असे शिरोमणी अकाली दलानेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे भारतमाता की जय म्हणण्यावरून निर्माण झालेला वाद अद्याप शमलेला नसल्याचे स्पष्ट होत आहे.
शिरोमणी अकाली दलाचे अमृतसर अध्यक्ष सिमरनजितसिंग मान यांनी भारतमाता की जय म्हणण्याबाबतची भूमिका जाहीर केली आहे. शीख समाज महिलेची पूजा करू शकत नसल्यानेच भारतमाता की जय म्हणू शकत नाही, असे मान म्हणाले.शिखांनी वाहेगुरूजी का खालसा, वाहेगुरूजी की फतेह असे म्हटले पाहिजे, असे अकाली नेत्यांचे म्हणणे आहे. जे लोक भारतमाता की जय म्हणणार नाहीत ते देशभक्त असूच शकत नाहीत, अशांविरुद्ध खटला चालविला पाहिजे अशी भूमिका भाजपने मांडल्यानंतर अकाली दलाने हे मत व्यक्त केले .एआयएमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी, कोणी आपल्या गळ्यावर सुरी ठेवली तरी भारतमाता की जय म्हणणार नाही, असे जाहीर केल्यानंतरचा वाद सुरूच आहे.