भारतरत्न पुरस्काराने सन्मानित जागतिक किर्तीचे सतारवादक पं. रवीशंकर यांचे अमेरिकेतील सॅन डिएगोमध्ये मंगळवारी निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. वर्षभरापासून त्यांना श्वसनसंस्था आणि हृद्यविकाराचा त्रास सुरू होता. रवीशंकर यांच्या जाण्याने भारतीय संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. रविशंकर यांचा जन्म वाराणसी येथे ७ एप्रिल १९२० रोजी झाला. रविशंकर यांना १९९९ साली देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान 'भारतरत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच तीन वेळा ग्रॅमी पुरस्कारानेही सन्मान करण्यात आला होता. देशविदेशात त्याच्या अनेक मैफिली झाल्या आहेत. रवीशंकर यांनी भारतीय संगीताला आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगळी ओळख मिळवून दिली. विशेष म्हणजे सतार हे वाद्य सर्वसामान्य रसिकांपर्यंत पोहचवण्यात रवीशंकर यांचे मोठे योगदान होते. रविशंकर यांना तीन वेळा ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांचा सतारवादनाचा वारसा त्यांची मुलगी अनुष्का शंकर पुढे चालवत आहे.