माणसाच्या पोटात अनेक उपकारक जीवाणू असतात तसेच वृक्षांनाही जीवाणू मदत करीत असतात, असे दिसून आले आहे. वृक्षांच्या वाढीसाठी आवश्यक अशी पोषके हे जीवाणू तयार करतात. मानवी आरोग्यासाठी काही जीवाणू घातक असले तरी बरेच जीवाणू उपकारकही असतात, त्यामुळे पोषण तर होतेच शिवाय लठ्ठपणा व इतर आजारांपासून संरक्षण मिळते. वृक्षांमधील मायक्रोबायोमचा शोध वैज्ञानिकांनी घेतला असून वृक्ष माणसाप्रमाणे चालू शकत नसल्याने त्यांना अन्नासाठी या जीवाणूंवर अवलंबून राहावे लागते असे दिसून आले आहे. जीवाणूंच्या मदतीने ते पोषके तयार करतात. वॉशिंग्टन विद्यापीठाच्या संशोधकांनी अतिशय खडकाळ अशा भागात असलेल्या पॉपलर वृक्षांमध्ये जीवाणू पोषके तयार करतात, हे दाखवून दिले आहे शिवाय या पोषकांमुळेच हे वृक्ष वाढत असतात. सूक्ष्मजीव विविध प्रकारचे असतात. या संशोधनामुळे कृषी पिके व जैवऊर्जा पिके यांच्याकरिता उपयोग होऊ शकतो. काही विशिष्ट सूक्ष्मजीवाणू हे जैविक क्रियांच्या आधारे वृक्षांना त्यांचे अन्न तयार करण्यास मदत करीत असतात, असे श्ॉरॉन डॉटी यांनी म्हटले आहे. नायट्रोजन स्थिरीकरण ही नैसर्गिक प्रक्रिया असून ती जीवाणूंसाठी आवश्यक अशते. नैसर्गिक अवस्थेत कमी पोषके खडकाळ, उजाड माळरानावरही वृक्षांत असतात पण जीवाणू नायट्रोजन स्थिरीकरणाच्या माध्यमातून पोषकांचे प्रमाण वाढवतात. डाळी, सोयाबीन, लवंगा, अल्फाल्फा व ल्युपाइन्स या वनस्पतीत नायट्रोजन स्थिरीकरण जीवाणूंमुळे जास्त चांगले होते. जीवाणू हे वातावरणातील नायट्रोजनचे स्थिरीकरण करण्यात वनस्पतींच्या मुळांना मदत करतात. या सहजीवनातून मुळांच्या माध्यमातच नायट्रोजन स्थिरीकरण होते असे मानले जात होते पण फांद्याच्या माध्यमातूनही ते होते त्यात मुळांवरील विशिष्ट जैविक यंत्रणा गरजेची नसते. साधारण कृषी पिकांच्या वाढीसाठी हे संशोधन महत्त्वाचे आहे. जंगली पॉपलर, विलो वनस्पती यांच्यापासून मिळवलेले जीवाणू हे मका, टोमॅटो व ढोबळी मिरची यांना वाढीस मदत करतात. त्यात जास्त खते वापरावी लागत नाहीत. खतांचे संश्लेषण हे जीवाश्म इंधनांमुळे होते, त्यामुळे खतांच्या किमती जास्त असतात. कृषी व जैवऊर्जा पिके वाढवण्यासाठी खतांचा वापर होत असतो. गोल्फ मैदानावरील हिरवळीसह अनेक ठिकाणी खतांचा वापर करावा लागतो, खतांची अनेकदा पुरेशी उपलब्धता नसते त्यामुळे वनस्पतींना उपयोगी ठरणारे जे जीवाणू खडक व वाळूत असतात, त्यांचा उपयोग प्रत्यक्ष पिकांसाठी करता येऊ शकतो. एरवी हे जीवाणू उजाड माळरानावरील वनस्पती वापरत असतात. त्यामुळे खतांचा वापर तर कमी होईल शिवाय उत्पादकताही वाढेल, असे ‘प्लॉसवन’ या नियतकालिकातील शोधनिबंधात म्हटले आहे.