जगात भारत साखरेच्या उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर असून यंदाच्या वर्षी साखरेचे उत्पादन चार टक्क्य़ांनी वाढून २५.५ दशलक्ष टन होण्याची शक्यता आहे. विविध राज्य सरकारांनी दिलेल्या अंदाजाच्या आधारे हे अनुमान काढण्यात आले आहे.
अन्न मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक प्रमुख राज्यांच्या ऊस आयुक्तांबरोबर झाली त्यावेळी राज्यांनी साखर उत्पादनाची स्थिती मांडली. उत्तर प्रदेशातील साखर कारखान्यांनी गाळप हंगाम लवकर सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे, असे अन्न सचिव सुधीर कुमार यांनी सांगितले.
यंदाच्या वेळी साखर उत्पादनाचा कुठलाही पेच नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत काही टनांनी साखरेचे उत्पादन जास्त होईल असे ते म्हणाले.
वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, २०१४-१५ या वर्षांत साखरेचे उत्पादन २५.५ मेट्रिक टन होईल. गेल्या वर्षी ते २४.५ मेट्रिक टन होते. साखरेचे विपणन ऑक्टोबर ते सप्टेंबर दरम्यान होते. महाराष्ट्रात साखरेचे उत्पादन ९.१ मेट्रिक टन अपेक्षित असून उत्तर प्रदेशात ६.२ मे. टन तर कर्नाटकात ४.२५ मे. टन साखर उत्पादन अपेक्षित आहेत. ऊस आयुक्तांनी हा अंदाज वर्तवला असून तो भारतीय साखर कारखाना संघटनेच्या अंदाजाशी जुळणारा आहे. साखर संघटनेने २५ ते २५.५ मेट्रिक टन साखर उत्पादनाचा अंदाज वर्तवला आहे