काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी कंपनी कायदा अधिकाऱ्यांपुढे ब्रिटिश नागरिक जाहीर केल्याने त्यांच्याविरोधात खटला दाखल करावा, या मागणीसाठी दाखल करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
सरन्यायाधीश एच.एल.दत्तू व न्या. अमिताव रॉय यांनी लोकहिताच्या याचिकेतील कागदपत्रांच्या अस्सलतेबाबत शंका उपस्थित केली. या किरकोळ याचिकेवर आपण चौकशीचे फेरे सुरू करायचे का, असा सवाल करीत न्यायालयाने याचिका फेटाळली. वकील एम.एल.शर्मा यांनी याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची केलेली मागणी न्यायालयाने याआधी फेटाळली होती. अलीकडेच भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी असा आरोप केला होता, की काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी कंपनी कामकाज अधिकाऱ्यांपुढे आपण ब्रिटिश नागरिक असल्याची कबुली दिली होती.