व्यक्तिगत गोपनीयतेवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी स्वागत केले आहे. न्यायालयाच्या निकालाने फॅसिस्ट शक्तींना चांगलीच चपराक बसली आहे, असे म्हणत गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. व्यक्तिगत गोपनीयता हा मूलभूत अधिकार असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे अनेक योजनांसाठी आधार कार्डची सक्ती करण्याच्या केंद्र सरकारच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसणार आहे.

‘व्यक्तिगत गोपनीयता हा मूलभूत अधिकार असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत आहे. व्यक्तिगत गोपनीयता नागरिकांच्या स्वातंत्र्याचा महत्त्वाचा भाग आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे फॅसिस्ट शक्तींना आणि विचारांना चपराक बसली आहे. नागरिकांवर पाळत ठेवून दडपशाही करण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना हा जोरदार धक्का आहे,’ असे ट्विट करत राहुल गांधींनी न्यायालयाच्या निर्णयावर भाष्य केले.

याआधीही काँग्रेसने केंद्र सरकारकडून करण्यात येत असलेल्या आधार कार्डच्या सक्तीवर टीकेची झोड उठवली होती. ‘काँग्रेस सरकारने आधार कार्डचा वापर करताना व्यक्तिगत गोपनीयतेला धक्का लावला नव्हता. आधारच्या संकल्पनेत कोणताही दोष नाही. मात्र भाजप सरकारकडून चुकीच्या पद्धतीने आधार कार्डची सक्ती केली जात आहे,’ अशा शब्दांमध्ये काँग्रेसकडून भाजपवर टीका केली होती.

सरकारच्या अनेक कल्याणकारी योजनांसाठी आधार क्रमांक अनिवार्य असल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले होते. मात्र याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या होत्या. आधार सक्तीमुळे व्यक्तिगत गोपनीयता या मूलभूत अधिकाराचा भंग होत असल्याचा दावा याचिकाकर्त्यांकडून करण्यात आला होता. याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ सदस्यांच्या घटनापीठासमोर सुनावणी सुरु होती. व्यक्तिगत गोपनीयता हा मूलभूत अधिकार आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला होता. बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने यावर निर्णय दिला. राज्यघटनेतील कलम २१ नुसार व्यक्तिगत गोपनीयता हा जगण्याचा मूलभूत अधिकार असल्याचे न्यायालयाने सांगितले. सरन्यायाधीश जे एस खेहर यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने हा निर्णय दिला.