लडाख सीमेवर चीनच्या सैन्याने केलेल्या घुसखोरीचा प्रश्न भारत आणि चीनने सोडविला आहे. सैन्य माघारी घेण्यास शुक्रवारपासून सुरुवात झाली असून ही प्रक्रिया ३० सप्टेंबपर्यंत पूर्ण होणार आहे, असे परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी येथे स्पष्ट केले. हा प्रश्न सोडविणे ही मोठी उपलब्धी असल्याचे त्या म्हणाल्या. भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी एकत्रितपणे बसून सीमेवरील घुसखोरीचा तिढा सोडविला आहे, यासाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे, असे स्वराज यांनी येथे भारतीय वार्ताहरांना सांगितले.
चर्चेत पाकचाच खोडा
भारत आणि पाकिस्तान यांच्या परराष्ट्र सचिवांची भेट गेल्या आठवडय़ात ठरविलेली असताना हुर्रियतच्या नेत्यांशी चर्चा करून पाकिस्तानने भारतासमवेत होणाऱ्या चर्चेत अडथळे आणले, असा आरोप सुषमा स्वराज यांनी केला. आमच्या नव्या सरकारने पाकिस्तानला नवीन संकेत दिला, परंतु त्यांनी सर्व डावच उधळून लावला, या शब्दांत स्वराज यांनी पाकिस्तानवर तोफ डागली.