तेलंगणामध्ये टिपर ट्रक आणि ऑटो रिक्षा यांच्यामध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील १५ जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातग्रस्त कुटुंब महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात राहणारे असल्याचे कळते. ते अदिलाबादच्या पोच्चम्मा मंदिरात दर्शनासाठी निघाले होते. देवदर्शनासाठी जाताना हा अपघात झाला असल्याचीही माहिती मिळते आहे.
तेलंगणामधील अदिलाबाद जिल्ह्यातील देगाव गावाजवळ ही दुर्घटना घडली आहे. शनिवारी रात्री हा अपघात घडला आहे. मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये पाच महिला आणि सात मुलांचा समावेश आहे. आदिलाबाद जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक तरुण जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात भाइन्साच्या बाहेरील भागात घडलीय. टिपर ट्रक हा धान्यानं भरला होता. अपघातानंतर त्यातील सामानाचं वजन अंगावर पडल्याने १३ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर उपचारासाठी घेऊन जात असताना इतर दोघांनी आपला प्राण सोडला.