मध्य आसाममध्ये तेघरिया येथे दिमापूर-कामाख्य बीजी एक्सप्रेसचे दहा डबे रूळावरून घसरल्याने ५० प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी १९ जणांची प्रकृती गंभीर आहे. रेल्वे घसरल्याने १०० मीटर रूळाचे नुकसान झाले असून त्यामुळे या मार्गावरील आठ गाडय़ा रद्द करण्यात आल्या. दिब्रुगड-नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस ही गाडी लुंबिंग येथेच थांबवण्यात आली. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, रेल्वेचे इंजिन व दहा डबे हे मोरीगाव जिल्ह्य़ात जागीरोड भागात पहाटे दोन वाजता घसरले. १९ प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना गुवाहाटी मेडिकल कॉलेजच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनेक रूग्णांना उपचारानंतर घरी जाऊ देण्यात आले. रेल्वे रूळावरून घसरण्याचे कारण शोधले जात आहे. वरिष्ठ रेल्वे अधिकारी घटनास्थळी गेले असून मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.