पाण्याखालून मारा करून सुमारे दीड हजार किमीपर्यंतच्या अंतरावरील शत्रूच्या ठिकाणचा वेध घेऊ शकणाऱ्या ‘के-५’ या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राची भारताने रविवारी यशस्वी चाचणी केली. जमीन आणि हवेपाठोपाठ पाण्याखालूनही शत्रूवर हल्ला करू शकणाऱ्या या क्षेपणास्त्राच्या चाचणीमुळे अशी ‘अण्वस्त्र त्रयी’ असलेला भारत जगातील पाचवा देश बनला आहे.
  बंगालच्या उपसागरात पाण्याखाली उभारलेल्या तळावरून या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी झाली. याआधी या क्षेपणास्त्राच्या दहा चाचण्या झाल्या असून रविवारी याची अंतिम चाचणी झाली. त्यामुळे लवकरच भारताच्या ताफ्यात येणाऱ्या ‘आयएनएस अरिहंत’सारख्या देशी पाणबुडीवर हे क्षेपणास्त्र तैनात करता येईल. याशिवाय भारत ‘के-१५’ आणि ‘ब्राह्मोस’ या अनुक्रमे ७५० व २९० किमीपर्यंतच्या लक्ष्याचा पाण्याखालून भेद करणाऱ्या क्षेपणास्त्रांचाही विकास करत आहे.
  भारताने पहिल्यांदाच पाण्याखालून मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची निर्मिती केली असून त्यामुळे भारताची ‘अण्वस्त्र त्रयी’ पूर्ण झाली आहे. याआधी भारताने जमीन व हवेतून मारा करू शकणाऱ्या अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्रांची चाचणी केली आहे. अशी युद्धक्षमता असलेला भारत पाचवा देश बनला आहे. केवळ अमेरिका, फ्रान्स, रशिया आणि चीन या देशांकडेच अशी क्षमता आहे.