उत्तर प्रदेशच्या कारभाराची सूत्रे स्वीकारल्यानंतर एका आठवडय़ाच्या आत जवळजवळ ५० धोरणविषयक निर्णय घेऊन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्याला काम करायचे असल्याचे दाखवून दिले आहे. मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी सचिवालयाच्या कानाकोपऱ्याची पाहणी करून सरकारी यंत्रणेत योग्य तो शिष्टाचार, आरोग्य आणि वक्तशीरपणा राखण्याबाबत आपण ठाम असल्याचे आदित्यनाथ यांनी दाखवून दिले. गेल्या ४० वर्षांत कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी सचिवालयाची पाहणी केली नव्हती. या आकस्मिक पाहणीत भिंतींवर थुंकलेल्या पानाचे डाग, वर्षांनुवर्षे साचलेल्या फायलींवर धुळीचे थर आणि जागेवरून गायब असलेले अधिकारी व कर्मचारी यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधून घेतले. त्याबरोबर त्यांनी सार्वजनिक ठिकाणी पान व पान मसाला खाण्यावर बंदी घालतानाच, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक पद्धत व सीसीटीव्ही लावण्याचे आदेश दिले. अशा धुळीमुळे सरकारी कर्मचाऱ्यांना क्षयरोगाची लागण होऊ शकते, असे मत आपल्या कार्यालयाला लागून असलेल्या विस्तारित इमारतीची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. दुसऱ्याच दिवशी काही मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी यांनी आदर्श घालून देण्यासाठी हातात झाडू घेतले! अवैध कत्तलखान्यांवर बंदी आणि मजनूविरोधी पथके स्थापन करण्यासाठी आदित्यनाथ यांनी तातडीने कारवाई करून अधिकाऱ्यांना कामाला लावले. त्यासाठी मंत्रिमंडळाची औपचारिक बैठक घेण्याचीही त्यांनी वाट पाहिली नाही. कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत आपला निर्धार व्यक्त करताना मुख्यमंत्र्यांनी गुन्हेगारांना राज्य सोडून जाण्याची तंबी दिली. कुठलेही कंत्राटी काम स्वीकारू नये, तर त्याऐवजी या कामांच्या प्रभावी अंमलबजावणीवर देखरेख ठेवावी, असे त्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले आहे.