भारत सरकारने चित्रपट अभिनेता शाहरुख खानच्या सुरक्षेची योग्य काळजी घ्यावी, असा अनाहूत सल्ला देणाऱ्या पाकिस्तान सरकारवर स्वत:चेच दात घशात घालण्याची वेळ ओढावली. पाकिस्तानी गृहमंत्र्यांच्या या विधानावर तीव्र शब्दांत टीका करत ‘आम्ही आमचे बघून घेऊ, तुमच्या घराची तुम्ही काळजी घ्या’ असे भारताने सुनावले. तर खुद्द शाहरुखनेही ‘मला व माझ्या देशाला फुकट सल्ले देऊ नका’ असे सांगत पाकिस्तानला चपराक लगावली.
भारतातील मुस्लिम नागरिक राष्ट्रविरोधी आहेत, अशी धारणा झालेल्या राजकीय नेत्यांचे आपण लक्ष्य बनतो, असे शाहरुख खानचे कथित वक्तव्य एका नियतकालिकात प्रसिद्ध झाले होते. ‘शाहरुख हा भारतात जन्मला आहे. त्यामुळे भारत सरकारने त्याच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, शाहरूखच्या विधानावर आगपाखड करणाऱ्या भारतीयांनी त्याची बाजू समजून घ्यावी,’ असे पाकिस्तानचे गृहमंत्री रेहमान मलिक यांनी म्हटले.
या विधानाचे भारतात तीव्र पडसाद उमटले. केंद्र सरकारसह सर्वच राजकीय पक्षांनी याला आक्षेप घेत पाकवर हल्लाबोल केला. ‘आपल्या नागरिकांची काळजी करण्यास भारत समर्थ आहे, पाकिस्तानने आपल्या देशवासीयांची काळजी करावी,’ असे सडेतोड उत्तर केंद्रीय गृहसचिव आर. के. सिंह यांनी पाकिस्तानला दिले.  तर, ‘पाकिस्तानने त्यांच्या देशातील अल्पसंख्याक हिंदूंचे संरक्षण करावे,’ असे भाजपने सुनावले.

मी भारतातच सुरक्षित
मुंबई : धर्माबद्दल संकुचित विचार करणारे काही लोक माझ्या मुसलमान अभिनेता असण्याचा संदर्भ क्षुल्लक फायद्यासाठी जोडून घेतात. असा गैरफायदा घेणाऱ्या लोकांना माझी भूमिका स्पष्ट व्हावी, असा माझा तो लेख लिहिण्यामागे उद्देश होता. पण, आम्ही भारतात सुरक्षित आहोत आणि आनंदीही आहोत, अशा शब्दांत शाहरुखने या संपूर्ण वादावर पडदा टाकला.