उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रेसाठी निघालेल्या बसला उत्तरकाशीजवळ अपघात झाला आहे. बस अडीचशे फूट खोल दरीत कोसळली असून या अपघातात २२ जणांचा मृत्यू झाला.  अपघातग्रस्त बसमधील प्रवाशांचा शोध सुरु असून स्थानिक पोलीस, भारत तिबेट पोलीस दलाचे जवान मोहीम राबवत आहे.

मध्यप्रदेशच्या इंदौरमधील २८ प्रवासी चारधाम यात्रेसाठी गेले होते. मंगळवारी संध्याकाळी गंगोत्रीवरुन दर्शन करुन परतत असताना भाविकांच्या बसला अपघात झाला. बस अडीचशे फूट खोल दरीत कोसळली. जवानांनी आठ जणांची सुटका केली असून २२ जणांचा मृत्यू झाला आहे. अंधारामुळे शोधमोहीमेत अडथळे येत असून अपघातग्रस्त बस ज्या भागात अडकली आहे तिथून जवळूनच भागीरथी नदी आहे. त्यामुळे अडचणीत भर पडली आहे. काही प्रवासी भागीरथी नदीत वाहून गेल्याची भीती व्यक्त होत आहे.

मध्य प्रदेशमधील मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना २ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. शिवराजसिंह यांच्या विनंतीनंतर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मृतदेह इंदौरपर्यंत नेण्यासाठी ट्रेनमध्ये विशेष बोगी जोडण्याचे आदेश दिले आहेत.