माजी पंतप्रधान व भाजपचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांना शुक्रवारी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते भारतरत्न हा देशातील सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. राजशिष्टाचार बाजूला ठेवून मुखर्जी शुक्रवारी कृष्ण मेनन मार्गावरील वाजपेयी यांच्या निवासस्थानी गेले आणि त्यांनी वाजपेयी यांना भारतरत्न हा सर्वोच्च किताब प्रदान केला. या वेळी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथसिंह आणि वाजपेयी यांच्या कुटुंबातील निवडक सदस्य उपस्थित होते.
आओ फिरसे दिया जलाए..
प्रसारमाध्यमांना या कार्यक्रमापासून दूर ठेवण्यात आले होते. वृद्धापकाळ व आजारपणामुळे गेल्या अनेक वर्षांपासून वाजपेयी सार्वजनिक जीवनातून निवृत्त झाले आहेत. वाजपेयी १९९८ ते २००४ या कालावधीत देशाचे पंतप्रधान होते. त्यांच्याच कारकीर्दीत भारताने अणुस्फोटांची यशस्वी चाचणी घेतली होती. पाकिस्तानशी संबंध सुधारण्यावर वाजपेयी यांनी अधिक भर दिला होता. त्यांच्याच काळात दिल्ली-लाहोर बससेवा सुरू करण्यात आली होती. कारगिल युद्धही वाजपेयी यांच्याच कार्यकाळात झाले होते.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना शुक्रवारी दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी जाऊन राष्ट्रपतींनी भारतरत्न देऊन सन्मानित केले.