गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप असलेले भारतीय जनता पक्षाचे नेते वरूण गांधी यांना बुधवारी न्यायालयाने दिलासा दिला. वरुण गांधी यांच्याविरोधात प्रक्षोभक भाषण केल्याबद्दल दोन खटले सुरू आहेत. पैकी एका खटल्यात न्यायालयाने त्यांच्यावरील आरोप फेटाळले. 
२००९मधील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी गांधी यांना एका समाजाला उद्देशून प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप होता. वरुण गांधी यांच्याविरोधात भारतीय दंडविधान संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. १७ मार्च २००९ रोजी बारखेडा पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात प्रक्षोभक भाषण केल्याबद्दल पहिल्यांदा प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आला. वरुण गांधी यांनी त्यांच्यावर लावलेले सर्व आरोप फेटाळले होते. आपल्याला बदनाम करण्याचा डाव आहे, असा आरोप त्यांनी केला.