निमलष्करी दलात निवृत्तीचे वय होण्याआधीच निवृत्त होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मागील वर्षभरात निमलष्करी दलातील अनेकांनी सेवेचा कालावधी पूर्ण होण्याआधीच निवृत्त होणे पसंत केले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्यांचे प्रमाण ४५० टक्क्यांनी वाढले आहे. अनेक जवान वैयक्तिक कारणांमुळे निमलष्करी दलातून स्वेच्छानिवृत्ती घेत असल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांनी दिली आहे. '२०१६-१७ या कालावधीत निमलष्करी दलातील ९०६५ जवानांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली आहे. यामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दल, सीमा सुरक्षा दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, इंडो-तिबेटियन सीमा पोलीस, सशस्त्र सीमा दल आणि आसाम रायफल्समधील जवानांचा समावेश आहे,' अशी माहिती किरण रिजीजू यांनी दिली. २०१४-१५ मध्ये सेवेचा कालावधी पूर्ण होण्याआधी निवृत्ती स्वीकारणाऱ्यांची संख्या ५,२८९ इतकी होती. २०१५-१६ या कालावधीत स्वेच्छानिवृत्ती स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. २०१५-१६ मध्ये निमलष्करी दलातील फक्त २,१०५ जवानांनी स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय घेतला. मात्र २०१६-१७ मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्यांचे प्रमाण तब्बल ४५० टक्क्यांनी वाढले आहे. 'नोकरीतील तणाव, अपुरे वेतन आणि प्रतिकूल परिस्थितीला कंटाळून लवकर निवृत्त होत आहेत,' अशी माहिती निमलष्करी दलातील सूत्रांनी इंडियन एक्स्प्रेससोबत बोलताना दिली. मोठ्या प्रमाणातील स्वेच्छानिवृत्तींमुळे निमलष्करी दलात आता कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. 'निमलष्करातील जवानांच्या निवृत्तीचा नकारात्मक परिणाम सुरक्षेवर होतो आहे. यासोबत सुरक्षेशी संबंधित विविध व्यवस्थांवरही स्वेच्छानिवृत्तीचा प्रतिकूल परिणाम होतो आहे,' असे गृहमंत्रालयातील सूत्रांनी सांगितले आहे. २०१६-१७ मध्ये स्वेच्छानिवृत्ती स्वीकारणाऱ्यांमध्ये सर्वाधिक प्रमाण सीमा सुरक्षा दलाच्या जवानांचे आहे. सीमा सुरक्षा दलाचे ४,२७४ जवान मागील वर्षभरात स्वेच्छानिवृत्त झाले आहेत. याशिवाय केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ३,२८०, तर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे ७६५ जवान गेल्या वर्षभरात स्वेच्छानिवृत्त झाले आहेत. '२० वर्षांच्या सेवेनंतर निमलष्कराचे जवान त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याला प्राधान्य देतो. त्यामुळे जवानांमध्ये स्वेच्छानिवृत्ती घेण्याची वृत्ती वाढते आहे,' असे केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांनी म्हटले आहे.